भाजपच्या वाढत्या जनाधाराने ममता बॅनर्जी यांना सत्ता गमावण्याची भीती : नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील तणाव टिपेला पोहचलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाशीरहाट येथील जाहीर सभेत तृणमूलच्या सर्वेसर्वा व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. प. बंगालमध्ये भाजपची लाट पाहायला मिळत आहे आणि भाजपला ३०० जागांचा टप्पा पार करण्यास हे राज्य महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. दरम्यान अमित शहा यांनीही भाजप यंदा ३००चा टप्पा पार करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
सत्तेच्या नशेत असलेल्या ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. भाजपच्या वाढत्या जनाधाराने त्यांना सत्ता गमावण्याची भीती वाटू लागली आहे. त्यातूनच त्यांचं संतुलन बिघडलं आहे, अशी तोफ मोदींनी डागली. ज्या पश्चिम बंगालच्या जनतेने तुम्हाला सत्ता दाखवली ती जनताच तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार आहे आणि ती वेळ आता दूर नाही. २०१९मध्येच पश्चिम बंगालची जनता तुमचा पत्ता साफ करणार आहे, अशा शब्दांत मोदींनी ममतांना लक्ष्य केले.
दहशतीच्या जोरावर आपण सत्ता भोगत राहू, असं दीदींना वाटत असेल तर ते त्यांनी आता विसरायला हवे. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस असे थोर पुरुष ज्या मातीने दिलेत तेथील जनता अशी दहशत सहन करणार नाही. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोतील व्यंग ममतांना सहन झालं नाही. एक चित्रकार असूनही त्यांनी बंगालच्या कन्येला जेलमध्ये धाडले. इतका राग कशासाठी? तुम्ही तर चित्रकार आहात. तुमची पेंटिंग्ज करोडो रुपयांना विकली जातात. तेव्हा माझे तुम्हाला सांगणे आहे की, तुम्ही माझे वाईटात वाईट चित्र काढा आणि २३ मे नंतर मी पुन्हा पंतप्रधान होईन तेव्हा ते मला भेट द्या. मी आदराने त्याचा स्वीकार करेन आणि आयुष्यभर ते चित्र जपून ठेवेन. कुठेही एफआयआर नोंदवणार नाही! असेही मोदी म्हणाले.