MonsoonNewsUpdate : GoodNews : आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार !!
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच आता सर्वांसाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. तर मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.
नैऋत्य मोसमी पाऊस आज (24 मे) केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी 1 जूनच्या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. 2009 नंतर भारताच्या भूमीवर हंगामी पावसाची ही पहिलीच सुरुवात असल्याचं आयएमडीनं म्हटलं. मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चित्र आहे.
36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार…
दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात शेती पिकांना यापावसाचा फटका देखील बसला आहे.
पुढील चार-पाच दिवस राज्यात संततधार
पूर्व – मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याचबरोबर वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन – तीन दिवसांपासून अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणातील काही ठिकाणी शुक्रवारीही मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकरण्याची शक्यता असून त्याची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या प्रणालीमुळे कोकण किनारपट्टीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, उत्तर तेलंगणा ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज कुठे ?
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर, बुलढाणा, यवतमाळ.
हलक्या सरींचा अंदाज
धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली , जालना, छत्रपती संभाजीनगर.
