सॅम पित्रोडा यांनी जाहीर माफी मागावी , दंगल ८४ ची असो कि गुजरातची पीडितांना न्याय मिळायलाच हवा : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सॅम पित्रोडा यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकणी जाहीर माफी मागावी असं म्हटलं आहे. सॅम पित्रोडा यांनी १९८४ च्या दंगलीचं काय घेऊन बसलात? ती दंगल तर घडून गेली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात काय केलं हे देशाला सांगावं असं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान याआधी काँग्रेस पक्षाने पत्रक जारी करत हे त्यांचं वैयक्तित मत असून पक्षाशी त्यांचं काही देणं घेणं नाही असं सांगत फारकत घेतली होती.
‘सॅम पित्रोडा यांनी १९८४ च्या दंगलीसंबंधी जे भाष्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. मी त्यांना फोन करुन सांगितलं की, तुम्ही जे बोललात ते खूप चुकीचं होतं. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि जाहीर माफी मागावी’, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. याआधी काँग्रेसने पत्रक जारी करत सांगितलं होतं की, ‘१९८४ दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. याविरोधात सॅम पित्रोडा अथवा कोणीही व्यक्त केलेलं मत किंवा वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचं मत नाही. १९८४ दंगल पीडितांना आणि २००२ गुजरात दंगल पीडितांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात त्यांच्या धर्म, रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला आमचा विरोध आहे’.