ParliamentNewsUpdate : अखेर लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा निवड , पंतप्रधान मोदी , राहुल गांधी यांच्यासह सर्वांनी केले अभिनंदन….

नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी NDAच्या ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ओम बिर्ला हे 17 व्या लोकसभेचेही अध्यक्ष होते. तर इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सुरेश यांना उमेदवारी दिली होती. या निवडींनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी , विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी ओम बिर्ला यांनी त्यांच्या आसनावर सन्मानाने विराजमान केले . यावेळी बिर्ला यांनी संसदेत उपस्थित सर्व खासदारांचे आभार मानले.
यावेळी बोलताना , पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलताना म्हणाले की, “ओम बिर्ला यांची दुसऱ्यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालीय. ओम बिर्ला 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष असताना संसदेनं अनेक महत्त्वपूर्ण कायदे पारित आले. बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या इतिहासात पहिल्यांदा ते कायदे पारित करण्यात आले.”
विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांनीही त्यांचे अभिनंदन केले . यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सरकारकडे राजकीय सत्ता असली तरी विरोधकसुद्धा भारतीय लोकांचा आवाज संसदेत मांडत असतात. संसदेचं काम व्यवस्थित चालावं, अशी आम्हाला आशा आहे. विरोधकांचा आवाज इथं मांडू दिला जाईल, अशी आम्हाला तुमच्याकडून आशा आहे. विरोधकांचा आवाज शांत करणं, हे लोकशाहीविरोधी आहे. या निवडणुकीनं दाखवून दिलंय की विरोधकांना या देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी बोलू द्यायला हवं.”
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणाले की, “संसदेत कोणत्याही भेदभावाशिवाय काम केलं जाईल अशी आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. कुणाचाही आवाज दाबला जाऊ नये. तुम्ही विरोधकांवर अंकुश ठेवत असता तसा तो सत्ताधाऱ्यांवरही ठेवावा.”
बिर्ला विरुद्ध के. सुरेश
आज लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीच्या पूर्वी , मंगळवारी (25 जून) विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल आणि डीएमकेचे टीआर बालू यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेऊन सभापतीपदासाठी दोन्ही गटात सामंजस्य असावं म्हणून उपसभापतीपद विरोधकांना देण्याची मागणी केली परंतु यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत झाले नाही त्यामुळे आज विरोधकांनी अध्यक्षपदासाठी कोडीकुन्नील सुरेश यांचे नाव घोषित केले . के सुरेश हे केरळमधून आठ वेळा खासदार राहिले आहेत आणि ते दलित समाजाचे नेते आहेत. ओम बिर्ला हे देखील दलित समाजातून येतात आणि ते राजस्थानमधील कोटा येथून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेत.
मंगळवारी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी म्हणतात की आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही एकत्र काम करायला तयार आहोत पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. आम्ही सत्ताधारी पक्षाच्या सभापती उमेदवाराला पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण मल्लिकार्जुन खरगे यांनी उपसभापतीपद देण्याचं सांगितल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजींनी त्यांना कॉल बॅक करायला सांगितला, अजून तो कॉल आलाच नाही.”
संसदेतील संख्याबळानुसार तेलगू देसम पार्टी आणि जनता दल युनायटेड सारख्या मित्रपक्षांसह एनडीएकडे 543 पैकी 293 मते आहेत. तर इंडिया आघाडीकडे 236 मते आहेत आणि त्यांना काही लहान गट आणि अपक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. सध्या लोकसभेच्या 16 जागा अपक्ष आणि छोट्या प्रादेशिक पक्षांकडे आहेत.
सभापतीपदासाठी मतदान होण्याची चौथी वेळ
सभापतीपदासाठी मतदान होण्याची वेळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आज ही तिसरी वेळ होती. यापूर्वी 1952, 1967 आणि 1976 मध्ये तीन वेळा सभापतीपदासाठी मतदान झालं होते त्यानंतर आज मतदान झाले मात्र आवाजी बहुमताने प्रोटेम स्पीकर यांनी बिर्ला यांना विजयी घोषित केले.
दरम्यान विरोधकांनी ‘अटी’ घातल्याचा आरोप करत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “सभापती हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो. सभागृह चालवण्यासाठी त्यांची निवड एकमताने केली जाते.परंतु काँग्रेसने सभापतीपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे हे दुःखद आहे.” तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि जेडीयूचे लालन सिंह यांनी विरोधक ‘दबावाचे राजकारण’ करत असल्याचे म्हटले.