उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांच्याकडून येचुरींविरोधात पोलिसात तक्रार दाखल

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांनी येचुरींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ‘हिंदू हिंसक आहे. रामायण आणि महाभारत हे त्याचे पुरावे आहेत’ या विधानावर प्रतिक्रिया देताना योग गुरू बाबा रामदेव यांनीही सीताराम येच्युरी यांच्यावर टीका करताना ‘सीताराम येचुरी यांनी आता त्यांचं नाव बदलून ‘रावण’ ठेवायला हवं,’ अशी टोला बाबा रामदेव यांनी लगावला आहे. दरम्यान, येचुरी यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत रामदेव यांनी येचुरी यांच्याविरोधात हरिद्वारमध्ये एफआयआर दाखल केला असून त्यांच्या विरोधात संपूर्ण देशात एफआयआर दाखल करण्यात यायला हवा,’ असं आवाहनही केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबा रामदेव यांनी सीताराम येचुरी यांना हा टोला हाणला. कम्युनिस्टांनी त्यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जगभर हत्या केल्या आहेत. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी जगभरात ३० कोटीहून अधिक हत्या करण्यात आल्या आहेत. मुघलांनी त्यांच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी १० कोटीहून अधिक लोकांच्या हत्या केल्या आहेत. परंतु, हिंदू सहिष्णू असल्याने आम्हाला कोणीही काहीही म्हणत असतात, असं बाबा रामदेव यांनी सांगितलं. व्यक्तीमध्ये हिंसा असणं हे स्वाभाविक आहे. सर्व समाजात हिंसक लोक असतात, असंही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने येचुरी यांची उमेदवारी रद्द करावी. त्यांना तुरुंगात टाकावं, अशी मागणी करतानाच कोणत्याही हिंसेचा, दहशतीचा कोणताही धर्म नसतो. हिंसा व्यक्तिच्या मनातील विकृती आहे, असंही ते म्हणाले. कम्युनिस्ट देवाला मानत नाहीत. तरीही त्यांनी त्यांचं नाव ‘सीताराम’ ठेवलं आहे. रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे, असं वाटतं तर मग हे नाव तरी का ठेवलं? आणि दुसरीकडे मात्र ‘सीता-राम’ हे नाव उच्चारताच कम्युनिस्टांकडून नाराजी व्यक्त केली जाते, असा टोलाही त्यांनी लगावला.