गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यात येईल : सुबोधकुमार जयस्वाल

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ला ही पोलीस दलासाठी मोठी हानी असून या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा हल्ला हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे, असा निष्कर्ष आताच काढणे योग्य नसल्याचेही जयस्वाल यांनी पुढे स्पष्ट केले. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शीघ्र कृती दलाचे (क्यूआरटी) १५ जवान शहीद झाले असून एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्याने पोलीस व सरकारी यंत्रणा हादरली असून पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी अत्यंत कठोर शब्दांत नक्षलवाद्यांना इशारा दिला.
नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सक्षम आहे आणि हल्ल्यानंतर लगेचच कारवाईची पावले उचलण्यात आली आहेत, असे जयस्वाल यांनी नमूद केले. गडचिरोलीत नक्षलवाद्यांची दहशत झुगारून लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने तसेच पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहीम राबवल्याने त्याचा बदला म्हणून हा हल्ला झाला का, असे विचारले असता ‘नक्षलवादी नेहमीच पोलिसांना लक्ष्य करतात’, असे उत्तर जयस्वाल यांनी दिले.
हे बलिदान वाया जाणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. जे लोक देशातील लोकशाही खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना निश्चितपणे सडेतोड उत्तर दिले जाईल. या घटनेने कोणत्याही प्रकारे पोलिसांचे मनोबल खच्ची होणार नाही उलट त्याहीपेक्षा अधिक मनोबलाने सरकार आणि पोलीस सर्व शक्तीनिशी अशा शक्तींचा सामना करतील आणि या शक्तींना पराभूत करतील, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. शहिदांच्या कुटुंबींयांसोबत माझ्यासह सर्वांच्याच संवेदना आहेत. हे बलिदान वाया जाणार नाही. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. केंद्राकडून संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. ही मदत घेऊन योग्यती कारवाई पोलीस व सरकार करेल, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.