MarathaAndolanNewsUpdate : उपोषणाच्या आठव्या दिवशीही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम, सर्व पक्षीय बैठकीवरही दिली प्रतिक्रिया

जालना : उपोषणाच्या आठव्या दिवशीही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून सरकारने मागणी मान्य केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे?. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगाव. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली? त्याचा तपशील जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
“गोरगरीबाच्या लेकरावर गुन्हे दाखल करण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. ते हसण्यावारी नेत आहेत. आरक्षण द्या अरे-तुरे बोलण बंद करतो. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे” असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. “तुम्ही मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुमच्या मनात काय आहे? हे कळू दे. मराठा समाज दगाफटका करणारा नाही. आमच्याकडून खोट नाट वदवून घेऊ नका” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“सरकारचा अध्यादेश आम्हाला मान्य नाही. वेळ घेऊन सरसकट आरक्षण देणार का?. आम्हाला अर्धवट आरक्षण नको. आरक्षण मिळेपर्यंत आमच आंदोलन थांबणार नाही”. “चर्चा करायची हे आंदोलनाला बसण्याआधी का नाही सांगितलं?. आठ दिवस रक्त जाळल्यानंतर यांना जाग आली. पण मी माझ्या समाजासाठी तयार आहे. मराठा समाजाला गरम केले जाते . यांना का आणि कशासाठी वेळ पाहिजे. हे त्यांनी इथे येऊन महाराष्ट्राला सांगाव. त्यानंतर आम्ही विचार करु” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्ही मनावर घेतलं तर ह्यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू, सरकारला किती वेळ पाहिजे ते सांगावं. सरकार वातावरण बिघडवू पाहत आहे. काही झालं तरी आमरण उपोषण सोडणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले. शांततेचं युद्ध आता पेलवणार नाही, किती दिवसात आरक्षण देणार हे सांगा. सरसकट आरक्षण देणार की नाही इथे येऊन सांगा. गोरगरिबांवर गुन्हे दाखल करू नका. सर्व पक्षीय बैठकीवर बोलताना ते म्हणाले की , कोणताही पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजलं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.