AurangabadNewsUpdate : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी काय केले ? चंद्रकांत खैरे यांचा पलटवार

औरंगाबाद : आज संभाजीनगरच्या विषयावर बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना काय केले असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी फडणवीस यांना विचारला आहे. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी का नाही हे नामकरण केले. ? तसेच फडणवीसांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नसल्याची टीकाही चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हे कडक उत्तर दिले आहे.
संभाजीनगरच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्याचाही पाठपुरावा आपण केला. पण केंद्राने यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी त्यांनी अशी वक्तव्य करू नये. फडणवीस मला मला बहिरे म्हणतात. मी बहिरा नाही, बहिरे तुम्ही झाला आहात. मला बहिरा नका म्हणू कारण तुमचा एक ज्येष्ठ नेता आमच्या इकडे बहिरा आहे, अशा शब्दात भाजप नेते हरिभाऊ बागडेंचं नाव न घेता खैरेंनी फडणवीसांवरतोफ डागली. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव दिले, तेव्हापासून मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्व जण संभाजीनगरच म्हणतो असेही खैरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या नामांतराबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष यावर काम करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून का संभाजीनगर केले नाही, हा भाजपचा दोष आहे, असा टोलाही खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.