एकच चूक पुन्हा पुन्हा का करतात दानवे ? सैनिकांचा पुन्हा एकदा “अतिरेकी म्हणून उल्लेख !!

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा आपल्याच प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाचे ४२ अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार केला आणि चूक लक्षात येताच जणू काही आपण बोललोच नाही अशा अविर्भावात चुकीची दुरुस्ती करीत ” सैनिक मारले ” अशी दुरुस्ती केली खरी पण रावसाहेब दानवे पुन्हा पुन्हा भारतीय जवानांना दहशतवादी का संबोधतात हा हि एक प्रश्नच आहे . रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न आता उपस्थित केला या निमित्ताने उपस्थित केला जात आहे . या आधीही त्यांनी मिग विमानाचे पायलट अभिनंदन यांचा उल्लेख हेलिकॉप्टरचा पायलट असा करून स्वतःचे हसे करून घेतले होते . तरीही रावसाहेब दानवे पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात असे एकूण चित्र आहे .
गेल्या काही दिवसांपूर्वीही पुलवामा हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले होते की, पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले. विशेष म्हणजे त्यांचा या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दानवेंनी शहीद जवानांचा अपमान केल्याची तीव्र भावना नेटकरी व्यक्त केली होती. या विधानावरून विरोधी पक्षांनीही दानवे लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा याबाबतच व्हिडीओ शेअर करून त्यांना हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा प्रश्न विचारला होता. सोलापुरातील हेरिटेज येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलले होते की, आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो, अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. तर त्यानंतरही दानवेंनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच ठेवली.