शार्जील उस्मानी कुठेही असू द्या त्याला अटक करू : गृहमंत्री

पुण्यातील एल्गार परिषदेत आक्षेपार्ह विधान करणारा शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. देशमुख यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , “पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र लिहिले होते.
शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणाऱ्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.