CoronaNewsUpdate : Maharashtra : राज्यात ३,५०९ नवे रुग्ण , ३ ,६१२ रुग्णांना डिस्चार्ज, ५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट सध्या ९४.६४ टक्के इतका असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५२ हजारांपर्यंत खाली आली आहे.
राज्यात आज 3509 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3612 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1828546 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.64% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 31, 2020
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्गाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. कोरोनामृत्यूंचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन प्रमुख शहरांमधील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. येथील दैनंदिन रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. आजची आकडेवारी पाहिल्यास राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंतचा एकूण मृतांचा आकडा ४९ हजार ५२१ इतका झाला आहे. त्यात सर्वाधिक ११ हजार ११६ मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर २.५६ टक्के इतका असून तो आणखी कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ५०९ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे ३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख २८ हजार ५४६ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २७ लाख ४७ हजार ६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३२ हजार ११२ (१५.१६ टक्के ) नमुने कोरोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ३०३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ९०२ इतकी खाली आली आहे. त्यात सर्वाधिक १३ हजार ५७२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यात १० हजार २२८ आणि मुंबईत ९ हजार ३२५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.