Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : दिवाळी सुट्यांचे नवे परिपत्रक , शाळांना आता उद्यापासून १४ दिवसाच्या दिवाळी सुट्या

Spread the love

कोरोनामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. दरम्यान दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ तारखेपासून शाळा सुरु कऱण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र हा निर्णय नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असेल. असे  वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.  दरम्यान दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची विनंती अखेर मान्य करण्यात आली असून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी असल्याचं जाहीर केलं आहे.


उद्यापासून (शनिवार) ऑनलाइन शिक्षणासाठी २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. वास्तविक सध्याच्या काळात  कोरोनामुळे शाळाच बंद असल्यामुळे यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. मात्र वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे हे जाहीर केलं. मात्र आधी पाचच दिवसांची सुट्टी दिल्याने अनेकजण हिरमुसले होते. आता मात्र ही सुट्टी २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा प्रस्ताव

कोरोना आणि लॉकडाउन या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत गुंतले होते. दरवर्षी दिवाळीची सुट्टी २१ दिवसांची असते. मात्र यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरा उघडल्याने दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली होती. दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणं बाकी आहे. त्याबाबत नियमावली आणि सूचनाही जाहीर झालेली नाही.

मुख्यमंत्री घेतील निर्णय

शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड म्हणाल्या कि , मे महिन्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. कारण पुन्हा निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचं पुढील वर्षी प्रवेश घेताना नुकसान होईल. आम्ही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मंत्रीमंडळात यासंबंधी कल्पना दिली आहे. साधारणत:  ही परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होते. पण सध्या तशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे २३ तारखेपासून नववी, दहावी, अकरावी, बारावीच्या शाळा सुरु कराव्यात अशी विनंती केली आहे,  अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी अकरावी प्रवेशासंबंधीही माहिती दिली. त्या म्हणाल्या कि , बैठकीनंतर मुख्यमंत्री, अशोक चव्हाण आणि मी असे सगळेजण चर्चेसाठी बसलो होतो. अकरावी प्रवेशाबाबत आज निर्णय होईल. येणाऱ्या काळात कदाचित आम्ही प्रवेश सुरु करु. माध्यमिक शिक्षण संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकू ण सुट्टय़ा ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, तसेच कामाचे एकू ण दिवस २३० होणे आवश्यक आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे एकू ण दिवस २०० व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकणिाऱ्या शिक्षकांच्या कामाचे दिवस २२० होणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सणाची शाळा सुट्टी घोषित करण्यात येत आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारवर

दरम्यान विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून या शिक्षणसंस्था कधी आणि कशा सुरू कराव्यात याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे, तर केंद्रीय विद्यापीठांबाबतचा निर्णय कुलगुरूंवर सोपवण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने शिक्षणसंस्था सुरू करण्याची सूचना आयोगाने दिली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता आयोगाने प्रत्यक्ष महाविद्यालयांचे वर्ग भरवण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शिक्षणसंस्था सुरू करण्यासच आयोगाने परवानगी दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!