IndiaNewsUpdate : सणासुदीच्या काळात हलगर्जीपणा करू नका, विशेष काळजी घ्या , पंतप्रधानांचा देशवासियांना मोलाचा सल्ला !!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा जेंव्हा ते देशाला संबोधित करतील तेंव्हा तेंव्हा देशभर चर्चा व्हायला सुरुवात होते . तशी आजही चर्चा सुरु झाली होती . शेवटी पंतप्रधान सातव्यांदा जनतेशी बोलले . सणासुदीच्या आणि कोरोनाच्या काळात विशेष काळजी घ्या असा मोठा आणि महत्वपूर्ण संदेश सांगण्यासाठी ते आले होते . ‘लॉकडाऊन गेला असला तरी कोरोना व्हायरस मात्र अद्याप गेलेला नाही’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना सावध केले. थोडक्यात काय तर “जब तक दवाई नही , तब तक ढिलाई नही…” या अमिताभच्या रिंग टोनचे विश्लेषण त्यांनी केले.
कोरोना लॉकडाऊन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सातव्यांदा देशाला संबोधित केले. मार्च महिन्यात १९ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’च्या आवाहनापासून या संबोधनांना सुरुवात झाली होती. ‘आज देशाचा रिकव्हरी रेट चांगला आहे. मृत्यू दर कमी आहे. जगातील साधन-संपन्न देशांच्या तुलनेत भारत आपल्या जास्तीत जास्त नागरिकांचं जीवन वाचवण्यात यशस्वी ठरलाय. कोविड संक्रमणाविरुद्ध लढाईत चाचण्यांची वाढती संख्या ही आपली मोठी ताकद राहिलीय’ असं म्हणत पंतप्रधानांनी करोनाविरुद्धच्या लढाईत विजयाची आशा व्यक्त केलीआहे. कोरोनावर लस येत नाही तपोर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत व्हायला नको, असे सांगताना ते म्हणाले कि , ‘आपल्या देशातील तज्ज्ञ कोरोना लशीसाठी खूप मेहनत घेत आहेत. कोरोनाची लस जेव्हाही येईल तेव्हा प्रत्येक भारतीयापर्यंत ती लवकरात लवकर कशी पोहचेल, याची तयारी सरकारकडून केली जात आहे. आज अमेरिका असेल किंवा युरोपातील इतर देश… या देशांत कोरोना संक्रमणाचे रुग्ण कमी होत होते, परंतु हे आकडे पुन्हा एकदा वेगानं वाढू लागलेत’ असं म्हणतानाच भारताची परिस्थिती इतर देशांपेक्षा सुधारलेली दिसत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान म्हणाले कि , ‘वेळेसोबत आर्थिक घडामोडींना चालना मिळत आहे. अधिकतर लोक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, जीवनाला गती देण्यासाठी रोज घरातून बाहेर पडत आहेत. सणासुदीच्या दिवसांत बाजारात पुन्हा उत्साह संचारला आहे. परंतु, आपल्याला हे विसरून चालणार नाही की लॉकडाऊन गेला असला तरी कोरोना व्हायरस मात्र अद्याप गेलेला नाही. गेल्या सात आठ महिन्यांमध्ये प्रत्येक भारतीयांनी केलेल्या प्रयत्नांसहीत सांभाळलेली परिस्थिती बिघडू द्यायची नाही’ असे सांगताना पंतप्रधानांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. ही वेळ निष्काळजी होण्याची नाही. अनेक फोटो, व्हिडिओंमधून हे स्पष्ट दिसतं की आता अनेक लोकांनी सावधानता बाळगणे बंद केले आहे. ही योग्य गोष्ट नाही. मास्कशिवाय तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला, कुटुंबातील लहानांना आणि वृद्धांना धोक्यात टाकत आहात, असे म्हणत मोदींनी नागरिकांना करोना नियमांचं पालन सुरूच ठेवण्याचं आवाहन केलंय. कोरोनावर औषध किंवा लस येत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार आहे. सणासुदीच्या काळात थोडाही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.