LoksabhaNewsUpdate : संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज, संसदेच्या सलामीलाच खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले हे प्रश्न….

लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेरोजगारी आणि कोरोनाचा विषय सभागृहात मांडला.कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला.यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे.परंतु असं होताना दिसत नाही. pic.twitter.com/MmwNSYUm1N
— Supriya Sule (@supriya_sule) September 14, 2020
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दररोज फक्त ४ तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही ऑनलाईन पद्धतीनेच दिली जाणार आहेत. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे १ ऑक्टोबरपर्यंत चालेल. या काळात, सलग १८ बैठका पार पडतील, ज्यामध्ये ४५ विधेयक आणि ११ अध्यादेश आणले जातील. यानंतर संसदेचं कामकाज सुरू करण्यात येईल अशी शक्यता आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आठवड्याच्या ७ ही दिवशी होईल. यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नाही. दररोज ४ तास दोन्ही सत्रांचं कामकाज सुरू असेल. तर अधिवेशनाचा पहिला दिवस वगळता उर्वरित राज्यसभा सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार, तर लोकसभा दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत असेल अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी प्रश्नोत्तराचा तास कमी करून तो फक्त अर्धातासच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कमी वेळात प्रश्न मांडून त्याचं उत्तर सरकारकडून मिळवण्याचं आव्हान सर्वच पक्षांच्या खासदारांपुढे आहे.
दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार सुळे यांनी शुन्यप्रहरात देशाच्या आर्थिक परिस्थितीवर आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारला. देश सध्या आर्थिक संकटात आहे. तरूणांना रोजगार नाही त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र तसं होतांना दिसत नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. लॉकडाऊनमुळे सगळा देश अडीच तीन महिने बंद होता. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला. यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही असंही सुळे यांनी म्हटलं आहे.