PoliticsOfMaharashtra : शिवसेना -राष्ट्रवादी यांच्यात चाललंय काय ? पवार – ठाकरे यांच्यात खलबते….

राज्यात कोरोना संसर्गाचे वारे वाहत असताना , महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय वादळ निर्माण झाले आहे . दरम्यान अनेक विषयावरून एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या एका खेळीमुळे उद्धव ठाकरे हे त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे . हा वाद वाढू नये म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल झाले असून त्यांच्याच महत्त्वाची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील मातोश्रीवर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरोप गेला होता. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोनकरून अजित दादांना निरोप दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश यावरून मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित दादांना दिला आहे.
राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशा तक्रारी शरद पवार यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढंच नाहीतर राज्यात जुलै महिन्यापर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा झाल्यानंतर मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं. पण यावर नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने ही अट मागे घेतली. याबद्दल पवारांनी जनतेची बाजू घेतली होती.
दरम्यान, महाविकास आघाडीचे शरद पवार हे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने ठाकरेंपुढे नाराजी उघड केली जाण्यार आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या अर्थविकासाच्या दृष्टीने व्यवहार खुले करण्याच्या विचारात होते. पण उद्धव ठाकरे सरकारने मात्र त्यांना विश्वासात न घेताच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहावं लागणार आहे.