लोकसभा २०१९ : आदर्श आचारसंहिता म्हणजे आहे तरी काय ?

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होते. पण आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात काय करावे आणि काय करू नये , म्हणजेच आदर्श आचारसंहिता. समाजातील जाती, धर्म, वंश, बोलीभाषा फूट पडेल किंवा त्यांच्यात वाद निर्माण होतील असे कोणतेही भाषण, प्रचार, घोषणा अथवा आश्वासने उमेदवाराने किंवा पक्षाने देऊ नये.
> मतांसाठी लोकांना पैसे वाटणे, महागड्या वस्तू देणे, मतदारांना अमिष दाखवणे, लालूच दाखवणं अशा गोष्टी आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या ठरतात.
> कोणत्याही उमेदवाराला रात्री १० च्या आतच आपला प्रचार संपवणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांच्या खासगी मालमत्तेचा किंवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही.
> कुठल्याही पक्षाला प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचार सभांमध्ये, मिरवणुकांमध्ये भाषणांमध्ये कसल्याच प्रकारचा अडथळा आणण्याचा अधिकार नाही. अन्यथा त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द निवडणूक आयोगाकडून रद्द होऊ शकते.
> आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या, मनोरंजनात्मक योजनांची घोषणा करता येत नाही. तसंच योजनांची अमंलबजावणीही बंद ठेवावी लागते.
> आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसेच सरकारी मालमत्ता, सरकारी गेस्ट हाऊस यांचा वापर करता येत नाही. असे केल्यास आचारसंहितेचा भंग ठरतो.
> आचारसंहिता मंत्र्यांनाही लागू असते . या काळात कोणत्याही मंत्र्याला रस्ता, पाणी, वीज अशा विकास कामांची आश्वासने देता येत नाहीत. तसेच निवडणूकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.