#CoronaVirusUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा

देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपणार असून हा टप्पा संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरू होणार असल्याचे सांगितले. त्याच्या आजच्या भाषणाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी देशातील नागरीकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. दरम्यान लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबाबतची माहिती १८ मे पूर्वी सविस्तरपणे दिली जाईल, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली.
या भाषणापूर्वी काल नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. या बैठकीत बहुतेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील नियमांमध्ये काही बदल करण्याची विनंती केली होती . या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्याच बरोबर आत्मनिर्भर भारतासाठी २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणाही मोदींनी केली. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी, उद्योगांसाठी, संघटीत आणि असंघटीत कामारासांठी आहे. येत्या काही दिवसांत अर्थमंत्र्यांकडून या विशेष आर्थिक पॅकेजची माहिती दिली जाईल.
दरम्यान लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा कधीपर्यंत असेल याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. करोना व्हायरसची लढाई ही दीर्घ काळ चालणार आहे. यामुळे जनतेने करोनाचा सामना करताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याचे नियम काटेकोरपणे पाळावेत. करोना व्हायरसविरोधातील लढाईत देशात लॉकडाऊन घोषित केला गेला. आता हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. १८ मे पासून हा चौथा टप्पा सुरू होईल. लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा नव्या स्वरूपात असेल आणि नवे नियम लागू केले जातील. राज्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावर हे नियम बदललेले असतील. या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची सविस्तर माहिती १८ मेपूर्वी दिली जाईल, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.
मोदी पुढे म्हणाले कि , स्वदेशीचे सूत्र आवलंबून देशाने पुढे जाणं आता गरजेचं आहे. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, गुतंवणूक वाढवण्यासाठी आणि व्यापार-व्यवसायाला गती देण्यासाठी या विशेष आर्थिक पॅकेजद्वारे सुधारणा केल्या जातील. जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली पाहिजे. यातून सर्व क्षेत्रांची क्षमता आणि गुणवत्ता वाढेल. संकटाच्या या काळात स्थानिक उत्पादनांचं महत्त्व लक्षात आलं. यामुळे नागरिकांनी स्वदेशी म्हणजे स्थानिक उत्पादनं खरेदी करावी आणि ती ग्लोबल मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवावी, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.