या ५ राज्यात ३ मेनंतरही सुरू रहाणार लॉकडाऊन ?

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत सुरूच राहणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार लॉकडाऊनचा कालावधी ३ मे रोजी समाप्त होतोय. परंतु, कोविड-१९ रुग्णांच्या संखेतील वाढ लक्षात घेऊन, करोनासाठी नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीने राजधानीत १६ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान शनिवारी आणखी पाच राज्यांनी ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी पुढे वाढवण्याची मागणी केली आहे. करोनामुळे सर्वात जास्त प्रभावी झालेल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील ९२ टक्के करोना रुग्ण केवळ मुंबई-पुण्याचे आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहावेत, अशी टोपे यांची मागणी आहे. परंतु, यावर पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांनी मात्र आपण केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करू असे सांगितले.
आसाम, केरळ आणि बिहार या संदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर कोणत्याही निर्णयावर पोहचणार हे नक्की. दरम्यान यापूर्वी, तेलंगणाने लॉकडाऊनचा कालावधी ७ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. आता ५ मे रोजी लॉकडाऊन आणखीन वाढवण्याची गरज आहे का? याचा आढावा राज्य सरकारकडून घेतला जाणार आहे.