Aurangabad News Update : कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रशासन काय करतंय ? मराठवाड्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३० , औरंगाबाद १७

कोरोना विरोधात लढण्यासाठी विभागीय आयुक्त प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येत असून परिस्थितीचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. विभागीय आयुक्तांनी औरंगाबाद येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालय, घाटी येथील सुपरस्पेशॅलिटी हॉस्पीटल, तसेच जालना आणि लातूर येथील रुग्णालयांना भेटी देऊन तेथील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पाहणी करुन आवश्यक सुचना दिलेल्या आहेत. तसेच 8 एप्रिल रोजी परभणी, नांदेड व हिंगोली येथील जिल्हधिकारी यांची बैठक घेवून कोरोना संदर्भीय केलेल्या उपाय योजना व सद्यस्थितीबाबत आढावा घेतला आहे व आवश्यक त्या सुचना दिलेल्या आहेत.
औरंगाबाद विभागातील रुग्णसंख्या आणि इतर उपाययोजनांबाबतची माहिती पुढीलप्रमाणे.. 9 एप्रिल रेाजी दुपारी 1 वाजेपर्यंत विभागातील कोरोना बाधित रुग्णसंख्या ३० एवढी आहे. त्यापैकी औरंगाबाद येथे १७ रुग्ण (एका रुग्णाचे मृत्यू झालेला असून एक रुग्ण बरा झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आले आहे), जालना-१, हिंगोली- १, लातूर ८ आणि उस्मानाबाद येथे ३ रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच बीड जिल्हयातील आष्टी येथील एक रुग्ण अहमदनगर येथील रुग्णालयात अॅडमिट आहे.
तपासणीसाठी आजपर्यंत एकूण नमुने १७५३ पाठविण्यात आले आहेत. (एका रुगणाचा नमुना मुंबई येथून पाठविण्यात आला होता) १४२१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ३०४ चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी १३९२ नमुने निगेटीव्ह आहेत व ३० नमुने पॉझिटीव्ह आहेत. २८ नमूने मानांकानुसार नसल्याने परत करण्यात आले आहेत. आतापर्यंत एका रुग्णाला कोराना विषाणू संक्रमणातून बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामध्ये सध्या २५८० व्यक्तींना घरीच विलगीकरणात व ३११ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच ६८८ व्यक्तींना अलगीकरण कक्षात (Isolation ward) ठेवण्यात आले आहे.
स्थलांतरित मजुरांसाठी विभागामध्ये सध्या २१६ मदत शिबीरे उभारण्यात आली आहेत. यामध्ये सध्या २०५३४ स्थलांतरीत मजुर वास्तव्यास आहेत. या मजुरांच्या जेवणाची, वैद्यकीय तपासणीची व इतर अनुषंगीक बाबींची व्यवस्था या शिबीरामध्ये करण्यात आलेली आहे. विभागातील ११३ शिवभोजन केंद्रामधून पाच रुपये प्रति थाळी प्रमाणे १३ हजार ७५ थाळया वितरीत करण्यात आल्या आहेत. विभागातील शासकीय गोदामांमध्ये ३९ हजार ८५२ मे.टन इतका अन्यधान्य, साखर इत्यादीचा साठा आहे. विभागात प्राधान्य कुटूंब योजना व एपीएल शेतकरी योजने अंतर्गत नियमित धान्य वाटप करण्यात येत असून याव्यतिरीक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदुळ एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी वितरीत करण्यात येत आहे.
दिल्ली रिटर्न तबलिगीची माहिती
दिल्ली–निजामुद्दीन/हरियाणा/पानीपथ येथील तबलीगी समाजाच्या मरकजला उपस्थित राहून विभागात परत आलेल्या व्यक्तींची माहिती शासनाकडून आलेल्या यादींनुसार व स्वतःहोवून पुढे आलेले व प्रशासनामार्फत शोध घेण्यात आलेले असे मिळून २८७ व्यक्ती आहेत. यापैकी २८५ व्यक्तींचा शोध घेण्यात आलेला आहे व उर्वरीत २ व्यक्तिंचा शोध घेणे सुरु आहे. आतापर्यंत विभागातील सर्व जिल्ह्यात मिळून १८९ व्यक्ती या कार्यक्रमाहून विभागात परत आलेल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हयातील ९२, जालना जिल्हयातील ६, परभणी जिल्हयातील १७, हिंगोली जिल्हयातील २, नांदेड जिल्हयातील १६, लातूर जिल्हयातील २७, उस्मानाबाद जिल्हयातील १४ व बीड जिल्हयातील १५ ऐवढया व्यक्तिंचा समावेश आहे. शोधलेल्या व्यक्तिंपैकी २४ व्यक्ती हया इतर जिल्हयातील आहेत. त्याची माहिती संबंधीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे. तसेच ७२ व्यक्ती या दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, तेलंगणा, हरियाणा, छत्तीसगड या राज्यातील असून त्याची माहिती संबंधी राज्यांना देण्यात आलेली आहे.
१८९ पैकी १८४ जणांचे घेतले ” स्वॅब ” चे नमुने
मराठवाडा विभागात असलेल्या एकुण १८९ व्यक्तींपैकी १२ व्यक्तिंना घरामध्ये तर १३५ व्यक्तींना संस्थेमध्ये Quarantine करण्यात आलेले असून ४२ व्यक्तींना Isolation ward मध्ये ठेवण्यात आलेले आहे. १८९ व्यक्तिंपैकी १८४ व्यक्तिंचे स्वॅब घेण्यात आलेले असून त्यापैकी ११ व्यक्तिंचे (औरंगाबाद-१, लातूर-८, हिंगोली-१ व उस्मानाबाद-१) स्वॅब पॉजिटीव्ह आलेले असून १६२ व्यक्तिंचे स्वॅब निगेटीव्ह आलेले आहेत व ११ व्यक्तिंचे स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे.
विभागामध्ये आढळून आलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचाही पाठपुरावा करण्यात येत असून आतापर्यंत अशा १२७० व्यक्तिंना शोध घेण्यात आलेला आहे. यापैकी २९२ लोकांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यामध्ये पॉजिटिव्ह-११, निगेटिव्ह-१८२ चे अहवाल प्राप्त आहे व ९९ स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहे.
औरंगाबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जाधववाडी येथे घाऊक व किरकोळ भाजीपाला खरेदी-विक्रीच्या दैनंदिन व्यवहाराच्या अनुषंगाने होत असलेल्या नागरिकांच्या गर्दीस तात्काळ आळा घालणे व सुरळीत खरेदी-विक्री व्यवहार चालावेत या दृष्टीकोनातून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने मा.विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व उपायुक्त (पुरवठा) यांच्या उपस्थितीत दि.०७.०४.२०२० रोजी बैठक घेऊन संबंधीत यंत्रणेला योग्य ते निर्देश व सुचना देण्यात आले आहे.