#CoronaVirusEffect : देशातील मजुरांच्या खात्यावर केंद्र सरकार पाठवणार “हि ” रक्कम….

देशातील मजुरांना कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. या मजूर वर्गासाठी सरकारकडून काही योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मोदी सरकारने या गरीब वर्गाच्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सुरूवात केली आहे. मजूरांसाठी सुरू करण्यात आलेल्या मनरेगा योजनेअंतर्गत केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने ६, ८३४ कोटी रुपये जारी केले आहेत. एवढी रक्कम पाठवण्यात येणार असल्याची माहिती स्वत: ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. सर्व राज्यांकडे ही रक्कम देण्यात येणार आहे.
मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार वर्ष २०२०-२१ साठी पहिला हफ्ता १५ एप्रिल २०२० आधी राज्यांना पाठवण्यात येणार आहे. सर्व राज्यांमध्ये मनरेगा मजूरी भिन्न आहे. महाराष्ट्रात मनरेगा मजूराला प्रतिदिन २३४ रुपये मिळतात. झारखंड आणि बिहारमध्ये मनरेगा मजूराला प्रतिदिन १७१ रुपये मिळतात. तर हरियाणामध्ये सर्वाधिक २८४ रुपये मिळतात. सामान्यपणे या मजूरांना वर्षभरात केवळ १०० दिवस काम मिळतं. ग्रामविकास विभागाने कोरोनाची वाढती समस्या लक्षात घेता मजूरांना मिळणाऱ्या मजूरीमध्ये काही बदल केले आहेत. १ एप्रिलपासून हे बदल लागू झाले आहे. देशभरातील मनरेगा मजूरांच्या वेतनात २० रुपयांनी वाढ केली आहे. प्रत्येक राज्यातील मनरेगा मजूराला प्रतिदिन २० रुपये अधिकचे मिळणार आहेत. या योजनेमुळे आपापल्या गावी पलायन करणाऱ्या मजुरांना अटकाव आणण्याचा सरकारचा मानस आहे. यातून त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यात येत आहेत.