वयोवृद्ध आई -वडिलांची हत्या करून पळून जाणारा नराधम मुलगाही अपघातात चिरडून ठार …
राजस्थान मध्ये आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून पळून जाणाऱ्या या मुलाचाही अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील भदाणा गावात २६ फेब्रुवारी रोजी बुधवारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भदाणा गावाजवळील डेगाना महामार्गावर एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गावातील लोकांनी ही मृत व्यक्ती भदाणा गावातील हनुमानराम (वय ४०) असल्याचं सांगितलं. एका अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे हनुमानराम गंभीर जखमी झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
याविषयी पोलिसांना दिलेली माहिती अशी कि , त्याच दरम्यान पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली की, हनुमानरामने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या केली. वडील रुघाराम (८२) आणि पतासीदेवी (८०) यांची त्याने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता आई आणि वडिलांच्या मृतदेहावर कुऱ्हाडीचे घाव आढळून आले. हनुमान रामाने आपले आई-वडिल गाढ झोपेत असताना डोक्यात आणि मानेवर कुऱ्हाडीने वार केले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. ही सगळी हकीकत हनुमानरामच्या पत्नीने पोलिसांना सांगितली.
दरम्यान आई-वडिलांची हत्या करून तो दुचाकीवरून पळून जात होता. त्याच्या पत्नीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता पण तो तिला न जुमनात पुढे निघून गेला. पत्नीने गावातील लोकांना बोलावून घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. भदाणा गावात वृद्ध आई-वडिलांची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एसपी विकास पाठक, एएसपी रामकुमार कस्वां, डीएसपी मुकुल शर्मा सह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृत आई-वडिलांचे मृतदेह हे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मुलगा हनुमानरामने हे कृत्य का आणि कशासाठी केलं याचा पोलीस तपास करत आहे. जमिनीच्या वादातून त्याने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.