Maharashtra Vidhansabha : भीमा -कोरेगाव आणि मराठा आंदोलनातील गुन्हे सरकारने घेतले मागे

बहुचर्चित भीमा – कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले असून मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याचं सांगतानाच शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान आपल्याविरोधीतील बाजू असणाऱ्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने शहरी नक्षलवादी संबोधल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. कोरेगाव-भीमा प्रकरणातील ६४९ पैकी ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मराठा आंदोलनातीलही ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणातील उरलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. हे गुन्हे किरकोळ स्वरुपाचे आहेत. मात्र सार्वजनिक मालमत्तेचं करण्यात आलेलं नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांबाबत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र आज विधान परिषदेत उत्तर देताना देशमुख यांननी नाणार आंदोलनातील केवळ तीनच गुन्हे मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. शेतकरी आंदोलनातील गुन्हेही मागे घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी देशमुख यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावरून तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला टोले लगावले. कोरेगाव-भीमा प्रकरणाची चुकीच्या दिशेने चौकशी झाली असेल तर पोलीस अॅक्ट किंवा एनआयए सेक्शन १०नुसार याप्रकरणाची महाराष्ट्र सरकार चौकशी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच तत्कालीन सरकारने आपल्याविरोधात बाजू असेल तर त्याला शहरी नक्षलवाद संबोधल्याची टीकाही त्यांनी केली.