औरंगाबादचे संभाजीनगर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील , ते इतरांचे काम नाही : चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा छेडल्यानंतर त्यावर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे . एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुद्द्यावर बोलताना त्यांनी म्हटले आहे कि , औरंगाबादकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही सरप्राईज देतील. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले कि , “राज ठाकरे हे आत्ता मागणी करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९८८ पासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करीत होते, शिवाय शिवसेनेनेच ही मागणी कायम लावून धरली होती. त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवलं जावं हे तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे ते स्वप्न उद्धव ठाकरेच पूर्ण करतील इतर कुणालाही ते जमणार नाही” असंही खैरे यांनी म्हटलं आहे.