अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्वस्त मंडळाची स्थापना , केंद्र सरकारकडून एक रुपयाचे पहिले दान

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट नावाचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा केली. या ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. यात ९ कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. या विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर केंद्र सरकारने या विश्वस्त मंडळाला १ रुपयाचे रोख दान दिले. या विश्वस्त मंडळाला मिळालेले हे पहिले दान आहे.
केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मितीच्या दिशेने काम सुरू व्हावे या उद्देशाने विश्वस्त मंडळाला १ रुपयांचे दान देत दानाची सुरुवात केली आहे. विश्वस्त मंडळाला केंद्र सरकारच्या वतीने हे दान गृह मंत्रालयाचे अवर सचिव डी. मुर्मू यांनी दिले. हे विश्वस्त मंडळ स्थावर मालमत्तेसह विनाअट कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही स्वरुपात दान, अनुदान, अंशदान आणि योगदान घेऊ शकणार आहे. सुरुवातीच्या काळात हे विश्वस्त मंडळ ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरण यांच्या घरामधूनच काम करणार आहे. मात्र, त्यानंतर विश्वस्त मंडळाचे कामयस्वरुपी कार्यालय सुरू करण्यात येईल. या विश्वस्त मंडळाला राम मंदिर निर्माण आणि संबंधीत विषयांवर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार असणार आहेत. विश्वस्त मंडळाचे नोंदणीकृत कार्यालय दिल्लीत असणार आहे.
या विश्वस्त मंडळात जगतगुरू शंकराचार्य, जगतगुरू माधवानंद स्वामी, युगपुरुष परमानंदजी महाराज हे देखील सदस्य असणार आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण विश्वस्त मंडळात असतील. या व्यतिरिक्त पुण्याचे गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांच्या नावांचा देखील समावेश आहे.
दरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेवरून शिवसेनेनं भाजपला चिमटा काढला आहे. ‘दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरविंद केजरीवाल यांनी भाजपचा पुरता घामटा काढला आहे. त्यामुळं भाजपला शेवटी प्रभू श्रीरामाला मध्ये आणावं लागलं आहे,’ अशी खोचक टीका शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.