संविधान रद्द करून भारताला हिटलरचा देश बनविण्याचं कारस्थान, असदुद्दीन ओवैसी यांची मोदी सरकारवर टीका

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारविरुद्ध तोफ डागली. ते म्हणाले कि , आज देशात ‘गोली मारो’सारख्या घोषणा दिल्या जात आहेत. देशाशी गद्दारी करणाऱ्यांना गोळ्या घालण्याचं आवाहन केलं जात आहे. असे असेल तर मला गोळ्या घाला. मी तयार आहे, असं सांगतानाच मी या देशातील घुसखोर नाही तर घुसखोरांचा बाप आहे, संविधान रद्द करून भारताला हिटलरचा देश बनविण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एनपीआर होत असेल तर एनआरसीही लागू होईल. दोघांमध्ये काहीच फरक नाही. आज नाही तर उद्या हे होणारच आहे. उद्या नाही झालं तर परवा होईलच, अस ओवेसी म्हणाले. एनपीआर आणि एनआरसी एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगू शकतात का? एनपीआर लागू झाल्यावर एआरसीही लागू होईल. त्यात आठ नवीन प्रश्नांचा समावेश का केला जात आहे? असा सवाल करताना ते म्हणाले कि , सीएएमुळे नागरिकत्व दिलं जातं आणि नागरिकत्व काढूनही घेतलं जातं, असं सांगून त्यांनी आसाममधील एक उदाहरणही दिलं. तुम्हाला बंगाली हिंदुंना नागरिकत्व द्यायचं आहे. पण आसाममधील ५ लाख मुसलमानांना नागरिकत्व द्यायचं नाही. धर्माच्या आधारे बनवण्यात आलेला हा पहिलाच कायदा आहे, असं त्यांनी लोकसभेच्या निदर्शनास आणून दिलं.
मी घुसखोर नाही. तर घुसखोरांचा बाप आहे. देशात एवढा मोठा पॉवरफुल्ल गृहमंत्री आहे. तरीही तीन-तीन गोळीबार होतात. हीच काय तुमची कायदा आणि सुव्यवस्था? देशाच्या गद्दारांना गोळ्या घालण्याची भाषा करता. मला गोळ्या घाला. मी मरायला तयार आहे. हे लोक भारताचं संविधान नष्ट करू पाहत आहेत. यांना हा देश हिटलरचा देश बनवायचा आहे. या सरकारने सत्तेचं केंद्रीकरण केलं असून हा लोकशाही पुढचा धोका आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मोदी म्हणाले होते कि, मी मुस्लिम महिलांचा भाऊ आहे. आज मुस्लिम महिला निदर्शने करत आहेत. मग भावाने नाराज होण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच आज देशाचं वातावरण १९३३ आणि १९३८च्या जर्मनीसारखं आहे, असंही ते म्हणाले.