Action : ‘देशातल्या गद्दारांना गोळ्या घाला’ असे प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक आयोगाचा दणका, स्टार कॅम्पेनरच्या यादीतून दोघांची हकालपट्टी

प्रक्षोभक वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश वर्मां यांना चांगलाच दणका दिला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने भाजपच्या या बेताल नेत्यांना वेसण घालताच पक्षाने भाजपच्या स्टार कॅम्पेनरच्या यादीतून या दोघांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाचे अवर सचिव पवन दिवाण यांनी जारी केलेल्या पत्रकात दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Election Commission of India: EC has ordered removal of Anurag Thakur & Parvesh Sahib Singh Verma from the list of star campaigners of BJP for #DelhiElections with immediate effect & until further notice. pic.twitter.com/LXAXePyAnn
— ANI (@ANI) January 29, 2020
आचार संहिता देखरेख पथकाने या दोन्ही नेत्यांनी धार्मिक भावना भडकवण्याचं वक्तव्य केल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने अत्यंत कठोर भूमिका घेत बेताल नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणारय. तर ११ फेब्रुवारीला दिल्लीच्या सत्तेचा फैसला होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सीएएला विरोध करणाऱ्यांविरोधात तीव्र शब्दात टीका केली. त्यानंतर त्यांनी गर्दीसमोरच ‘देशातल्या गद्दारांना गोळ्या घाला’ अशा घोषणा द्यायला लावल्या. वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या अनुराग ठाकूर आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगासंदर्भातला अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे सोपवला होता.
दिल्लीतले भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनीही मंगळवारी प्रक्षोभक भाषण दिलं होतं. “कश्मीरमध्ये जे काश्मिरी पंडितांसोबत झालं ते दिल्लीतही होऊ शकतं. शाहीन बागमध्ये जे हजारो लोक एकत्र आलेत ते तुमच्या घरात घुसतील. तुमच्या आया बहिणींवर, मुलींवर बलात्कार करतील. त्यांची हत्या करतील. त्यामुळे आता निर्णय लोकांना करायचा आहे.” असं प्रक्षोभक भाषण भाजप खासदारानी केलं. एवढंच नाही तर भाजप सरकारमध्येच तुमच्या घरातल्या व्यक्ती सुरक्षित राहातील असंही सांगितलं.