जागतिक मंदीचा परिणाम तात्पुरता, मंदीची परिस्थिती लवकरच संपुष्टात येईल , अमित शहा यांचा विश्वास
सध्या जागतिक मंदीचा तात्पुरता परिणाम दिसत आहे. देशातील मंदीची परिस्थिती लवकरच संपुष्टात येईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी बोलून दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर दिवस-रात्र काम करुन नवीन योजना आणत आहेत. मला विश्वास आहे, की काही दिवसातच आपण जागतिक मंदीतून बाहेर पडलेली पहिली अर्थव्यवस्था असेल असे भाकीतही अमित शहा यांनी केले.
हिमाचलची राजधानी शिमलामध्ये गुंतवणूकदार समिटमध्ये अमित शाह बोलत होते. रायझिंग हिमाचल प्रदेश इन्वेस्टर्स समिटच्या या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी लवकरच मंदीतून बाहेर येण्याचा विश्वास गुंतवणूकदारांसमोर बोलून दाखवला. दरम्यान, हिमाचल प्रदेशवर केंद्र सरकारचं विशेष लक्ष असल्याचंही अमित शाह यावेळी म्हणाले. ‘हिमाचल प्रदेशमध्ये सध्या १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. यासाठी राज्य सरकारचं अभिनंदन करतो. केंद्र सरकारचं लक्ष हिमालयीन राज्य आणि विशेषतः हिमाचल प्रदेशवर आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे राज्य खुप आवडतं,’ असं अमित शाह म्हणाले.
अमित शहा पुढे म्हणाले कि , ‘केंद्र सरकारने या छोट्याशा राज्यात १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे प्रकल्प आणले आहेत. आम्ही छोट्या राज्यातही आंतरराष्ट्रीय विमानतळाची कल्पना करतो आणि उड्डाणही यशस्वी झाले आहे. छोट्या राज्यातही तीन ते चार पदरी रस्ते बनवण्याचे आम्ही निश्चित केलं आहे’. अमित शाहांनी “इज ऑफ डुइंग बिझनेस” वरही भाष्य केलं. ‘पंतप्रधान मोदींनी किमान शासन आणि कमाल प्रशासन हे जे सूत्र अवलंबलं आहे, ते हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठ्या शिताफीने राबवलं आहे. याचा पूर्ण लाभ गुंतवणूकदारांनाच मिळणार आहे,’ असा विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला. याशिवाय केंद्र सरकारने कपात केलेल्या कॉर्पोरेट टॅक्सबद्दल माहिती देत याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी गुतवणूकदारांना केलं. ‘मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा २०१४ मध्ये इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये भारताचा क्रमांक १४२ वा होता. पण मोदी सरकारने फक्त पाच वर्षातच १४२ पासून ६३ वर झेप घेतली,’ असेही अमित शाह म्हणाले.