बालात्कार्यांना २१ दिवसात फाशीची शिक्षा…

आंध्र प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर, बलात्काराचा आरोप सिद्ध होताच आरोपीला २१ दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तसेच बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडण्यात येणार असून भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ मध्ये दुरूस्ती करून नवं ३५४ (ई) हे कलम तयार करण्यात आले आहे.
भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. हा कायदा आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा असून याला ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ असे नाव देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात यावी, या कायद्याच्या मसुद्याला देखील मंजुरी देण्यात आली आहे.
प्रस्तावित ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवणे, या २१ दिवसांमध्ये आरोपीला शिक्षाही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो. या प्रकरणांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, अॅसिड हल्ले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर, बालकांवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.