Aurangabad Crime : राजस्थानमध्ये विधूराला विक्री केलेल्या महिलेची सुखरूप सुटका, जवाहरनगर पोलिसांची कारवाई
औरंंंगाबाद : चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून राजस्थानमध्ये विधूर शेतकर्याला ५० हजार रु.त विक्री करण्यात आलेल्या महिलेची जवाहरनगर पोलिसांनी सुखरूप सुटका करीत सोमवारी (दि.९) औरंगाबादला आणून तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. सदर अपहृत महिलेची सुटका करण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील हनुमान नगरात राहणा-या सुवर्णा (वय २५) व सोनाली (वय २८) या महिलांना चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून शिवाजी भागाजी धनेधर (वय ४४, रा.गल्ली नंबर २, रमानगर) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने जुलै २०१९ मध्ये मध्यप्रदेशात नेवून विक्री केली होती. दरम्यान, सुवर्णाला शिताफीने १७ सप्टेंबर २०१९ रोजी उज्जैन येथील मकला गावातून मुक्त करून आणण्यात पोलिसांना यश आले होते. पण सोनालीचा ठाव लागत नव्हता.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मास्टर मार्इंड शिवाजी धनेधर याला गेल्या महिन्यात जवाहरनगर पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने मध्यप्रदेशात जावून सोनालीचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांनी देशामधे किती राज्यात हरनावदा कोठडा नावाचे गावे आहेत याचा गुगलवर शोध घेतला. तर मध्यप्रदेशाप्रमाणे राजस्थानातही हरनावदा कोठडा गाव असल्याचे कळले. त्यामुळे वायदंडे यांचे पथक एक आठवड्यापूर्वी राजस्थानात दाखल झाले होते. त्या गावात बरेचशे दरोडेखोर राहात असल्याचे जवाहरनगर पोलिसांना समजले आणि ज्या नारायण ठाकूर(४०) धंदा शेती यास सोनालीची विक्री करण्यात आली होती. तसे ९ नारायण ठाकूर हारनावदा गावात होते. शेवटी कळले की, एका नारायण ठाकूर ची पत्नी एक वर्षापूर्वी मयत झाली असून तो ४०वर्षाचा आहे व त्याला कोणी दुसर्या लग्नासाठी मुलगी देत नव्हते म्हणून त्याने राजस्थानातील दलालांमार्फत औरंगाबादेत शिवाजी धनेधर शी संपर्क साधला होता. शनिवारी दुपारी सोनालीला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले तेंव्हा ठाकूर घरात नव्हता तरीही सोनालीला गावकरी जवाहरनगर पोलिसांकडे जाऊ देत नव्हते ते पोलिसांनाच ५० हजार रु.द्या व सोनाली घेऊन जा अशी भाषा वापरत होते.पण पोलिसीखाक्या दाखवताच गावकरी वरमले व सोनालीची सुटका झाली आणि त्यांनी रविवारी संध्याकाळी तिला औरंगाबादेत आणले आणि आज सोमवारी संध्याकाळी जालन्याहून सोनालीच्या वडिलांना बोलवून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
या कारवाईत पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रध्दा वायदंडे, उपनिरीक्षक भारत पाचोळे, जमादार संदीप जाधव, मनोज अकोले, सुखदेव जाधव, गजेंद्र शिंगाणे, कृष्णा बो-हाडे आदींच्या पथकाने सोनालीची सुटका करून तिला औरंगाबादेत सुखरूप आणले.