गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर “महा ” चक्रीवादळ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस

Gujarat: NDRF teams arrived in Ahmedabad on 5th Nov, in the light of #CycloneMaha. NDRF assistant commandant Ajay Verma says, "6 teams have arrived here. They are being sent to different districts. We also have a medical officer with us. More NDRF teams are expected to arrive." pic.twitter.com/gPSbdzCYLN
— ANI (@ANI) November 5, 2019
अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळाची तीव्रता अधिकच वाढल्याने पालघर, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागात उद्या ६ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघरमध्ये या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असल्याने पालघरमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा आणि गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, नगर, पुणे, कोल्हापूर बरोबरच औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यात उद्या दि. ६ नोव्हेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद येथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर आणि नाशिकमध्ये ७ नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या ६ नोव्हेंबरच्या रात्री किंवा ७ नोव्हेंबरला पहाटे ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर आणि दीव दरम्यान समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. या ठिकाणी १०० ते १२० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातला धडकणाऱ्या या वादळाचा फटका महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसणार आहे. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी या दोन्ही जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरातमधील वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.
‘महा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबर रोजी शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाने जाहीर केलं आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या सर्व संबधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. पालिका, महसूल, आरोग्य, वैद्यकीय पथक, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणाच्या अधिकारी- कर्मचारी वर्गाने मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रजेवर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून तातडीने कामावर हजर होण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये वादळ धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि मुख्य सल्लागारही उपस्थित होते.