सोनिया गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षा , त्यांच्या पक्ष नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब
महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले असून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते ए . के . अँटोनी यांनी हि भूमिका स्पष्ट केली .
पत्रकारांशी बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते अँटोनी म्हणाले कि , पक्षाची इच्छा असेल तोपर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहतील. ते पुढे म्हणाले कि , काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याविषयी विनाकारण चिंता करू नका. काँग्रेस पुन्हा राखेतून झेपावत आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे सोपविण्यात आली होती. त्या वेळी ‘ही तात्पुरती, कामचलाऊ व्यवस्था’ असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. मात्र, आता काँग्रेसची ही भूमिका बदलली असून, पक्षाची इच्छा असेल, तोपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदावर राहतील, असे अँटनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
.के. सी. वेणुगोपाळ, रणदीपसिंह सुरजेवाला, जयराम रमेश हेही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. सोनिया गांधी आजारी आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र-हरियाणामध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणूक पुरेशा गांभीर्याने लढल्या गेल्या नाहीत. ‘सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग प्रशस्त करावा,’ असा प्रश्न अँटनी यांना विचारण्यात आला होता. त्यावर ‘सोनिया गांधी आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत. त्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि काँग्रेस पक्षाची इच्छा असेल तोपर्यंत त्या अध्यक्षपदावर कायम राहतील. संपूर्ण काँग्रेस पक्षाने एकमुखाने केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारले आहे. त्यांना आणि पक्षाला वाटेल तोपर्यंत त्या अध्यक्षपदी कायम राहतील,’ असे अँटनी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचा पराभव झाला तर तो सोनिया आणि राहुल गांधींमुळे आणि काँग्रेसचा विजय झाला तर तो परिस्थितीमुळे, असे म्हणणे दुटप्पीपणाचे आहे, असेही अँटनी म्हणाले. राहुल गांधींविषयीही चिंता बाळगू नका, ते पण अधिक ताकदीने परततील, असेही अँटनी म्हणाले.
