आर्थिक मंदी आणि बॉलिवूडची कमाईवर केलेले वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी घेतले मागे
मुंबईत २०० बीएमडब्ल्यूच्या विक्रीनंतर आणि बॉलिवूड सिनेमांच्या कमाईची तुलना करत भारतात कोणतीही आर्थिक मंदी नसल्याचा दावा मोदी समर्थकांकडून केला जात होता इथपर्यंत ठीक होते परंतु असा दावा थेट केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीच केल्याने त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल व्हावे लागले याची दाखल घेत अखेर त्यांना आपले विधान मागे घ्यावे लागले आहे. व्हिडिओतील माझ्या विधानाचा एकच भाग विपर्यास करून दाखवला. तरीही मी हे विधान मागे घेतो, असे त्यांनी जाहीर केले.
आपल्या खुलासे वजा निवेदनात रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे कि , ‘मुंबईत काल मी तीन सिनेमांच्या १२० कोटी रुपयांच्या कमाईबद्दल बोललो. या माहितीत पूर्ण तथ्य आहे. मी मुंबईत होतो, मुंबईला भारतात सिनेमाची राजधानी म्हणतात. मला सिनेमा उद्योगाचा अभिमान आहे. या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि टॅक्सही मिळतो. मी या सर्वाविषयी विस्तृतपणे बोललो होतो. माझ्या मीडियाशी झालेल्या चर्चेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. पण माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला.’
मोदी सरकारमध्ये विधी मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे, हे पूर्ण फेटाळले. अर्थव्यवस्थेतील मरगळीचा त्यांनी सपशेल इन्कार करत ते म्हणाले, ‘मला सिनेमे आवडतात. सिनेक्षेत्र चांगला व्यवसाय करत आहे. २ ऑक्टोबर रोजी तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ३ चित्रपटांनी १२० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे चित्रपट उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता देशातील अर्थव्यवस्था सावरलेली आहे, म्हणून तर एका दिवसात १२० कोटी रुपयांची कमाई चित्रपटांनी केली आहे. त्यांनी बेरोजगारीवरील NSSO च्या अहवालासही चुकीचे ठरवले.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासाचा दर सहा वर्षाच्या नीचांकावर ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेसह जगातील अनेक प्रमुख रेटिंग एजन्सींनीही भारताच्या वाढीचा दराचे अनुमान कमी केले आहे.