आयकर खात्याचे काँग्रेस कार्यालयाला टाळे , कर्मचाऱ्यांच्या घरांवरही छापे !! सूड भावनेतून कारवाई करण्यात येत असल्याची आरोप

महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका बाजूला आणि आयकर , ईडी ची कारवाई दुसऱ्या बाजूला अशा दुहेरी कोंडीत काँग्रेस अडकली आहे. आज आयकर खात्याने छापा घालून काँग्रेस मुख्यालयातील लेखा विभागाला टाळे लावले. एवढेच नव्हे, तर लेखा विभागातील पाच पगारदार कर्मचाऱ्यांच्या घरावर प्राप्तिकर खात्याने छापे घातले असून, सर्व कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांचीही चौकशी सुरु केली आहे. मोदी सरकारने राजकीय सूडभावनेतून केलेली ही अत्यंत निंदनीय कारवाई, अशा शब्दात काँग्रेसने या घटनेचा धिक्कार केला आहे.
दिल्लीतील २४, अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयातील लेखा विभागाच्या कार्यालयाला प्राप्तिकर खात्याने सीलबंद केले असून, या विभागात काम करणाऱ्या पाच पगारदार कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी छापे घातले आहेत. शुक्रवारपासून सुरू झालेली ही कारवाई अजूनही सुरूच असून, काँग्रेस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर अधिकारी ठाण मांडून बसले असल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांकडे जाऊन प्राप्तिकर अधिकारी विचारपूस करीत आहेत. त्याच वेळी काँग्रेसच्या लेखा विभागालाही प्राप्तिकर खात्याने टाळे ठोकले आहेत.
‘लोकसभा निवडणुकीवर ४० हजार कोटी रुपये खर्च करणाऱ्या भाजपकडे पैसा कुठून आला, याची विचारणाही कुठली संस्था करीत नाही आणि दुसरीकडे पाच वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने छापे घालण्यात येत आहेत, ही शरमेची गोष्ट आहे. या देशात विरोधकांसाठी एक आणि भाजपसाठी दुसरी अशा दोन नियमावली, दोन कायदे, दोन घटना आहेत. ही देशाच्या लोकशाहीसाठी वाईट बातमी आहे,’ अशी टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली.