कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी , कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मात्र निर्णयाला विरोध

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव कमालीचे वाढले असून देशभरात कांद्याची वाढती मागणी, त्यानुसार होत असलेला कमी पुरवठा आणि वाढत्या दारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याने कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
देशात या वर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाले असून देशातील बाजारांमध्ये मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र हा निर्णय घातक असून, अशा निर्णयाची काहीच गरज नसल्याचे शेतकरी नेते म्हणत आहेत. देशातील विविध बाजारपेठेत दक्षिण भारतातून येणार कांदाही अद्याप आलेला नाही. राज्यातील कांदाही उत्तर प्रदेश आणि परदेशात जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव गगनाला भिडून महाराष्ट्रात कांद्याचा वांधा होऊ नये यासाठी हा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने उद्या जेव्हा बाजार सुरू होईल तेव्हा सहाजिकच कांद्याची निर्यात होत नसल्याचे निर्यातीसाठीचा कांदा देशातील बाजारांमध्ये वळता होणार आहे. परिणामी कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने कांद्याचे भाव कमी होण्यास यामुळे मदत होणं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीला मात्र शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याचे कारण म्हणजे कांदा निर्यात बंदीचा थेट परिणाम शेतकरी आणि कांदा उत्पादकांवर होणार आहे. यापूर्वीच सरकारने निर्यात मुल्यात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता निर्यातच बंद केल्याने शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचा भाव कोसळणार हे मात्र नक्की.