‘मागासवर्गीय हे अस्पृश्य होते का ? ‘ केंद्रीय विद्यालयाच्या सहावीच्या प्रश्नपत्रिकेवरून तामिळनाडूत वाद

‘मागासवर्गीय हे अस्पृश्य होते का,’ या वादग्रस्त प्रश्न सहावीच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने तमिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाली आहे. केंद्रीय विद्यालयाची ही प्रश्नपत्रिका असल्याचे दिसत असले, तरी केंद्रीय विद्यालयाने ही प्रश्नपत्रिका बनावट असल्याचे म्हटले आहे. अंतर्गत गुणांसाठी सीबीएसई कुठल्याही प्रकारची प्रश्नपत्रिका काढत नाही, असे स्पष्टीकरण सीबीएसईकडून देण्यात आले.
‘द्रमुक’चे नेते स्टॅलिन यांनी ट्विटमध्ये म्हटले, ‘केंद्रीय विद्यालयाची सहावीतील प्रश्नपत्रिका पाहून मोठा धक्का बसला. अशा प्रश्नांनी समाजामध्ये दुही तयार होऊ शकते. प्रश्नपत्रिका ज्यांनी तयार केली असेल, त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हायला हवी.’
एका बहुपर्यायी प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. टीटीव्ही दिनकरन यांनीही सीबीएसईवर टीका केली आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका काढल्याबद्दल सीबीएसईचा तीव्र निषेध करतो.’ मुलांच्या मनावर या प्रश्नाने काय परिणाम होईल, याचा काहीही विचार प्रश्नपत्रिका काढताना केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय विद्यालयाने मात्र ही प्रश्नपत्रिका बनावट असल्याचा दावा केला. वाद निर्माण झाला असला, तरी ही प्रश्नपत्रिका केंद्रीय विद्यालयाचीच आहे, हे पुरते स्पष्ट झालेले नाही.