शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे उत्तर

मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही बांधील असून शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासगी विमा कंपन्यांविरोधात काढलेल्या इशारा मोर्चात विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘भारती अॅक्सा ‘ या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासगी पीक विमा कंपन्यांविरोधात मुंबईत मोर्चा काढला.
राज्यातील खासगी पीक विमा कंपन्यांवरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत काढलेल्या या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘आवाज कुणाचा…. शिवसेनेचा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. राज्यातील खासगी विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, अशा इशारा उद्धव यांनी राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला आहे. या वेळी उद्धव यांनी राज्यातील सर्वच बँकांनाही इशारा देत १५ दिवसांची मुदत दिली आहे.
आगामी १५ दिवसांच्या काळात कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या बोर्डावर झळकलीच पाहिजेत अशी सूचना उद्धव यांनी बँकांना केली. मोठमोठ्या लोकांनी बँकांची फसवणूक केली. या लोकांनी बँकांना चुना लावला, मात्र त्यांपैकी कुणीही आत्महत्या केली नाही याकडेही उद्धव यांनी लक्ष वेधले. खासगी विमा कंपन्या आणि बँकांना इशारा देताना उद्धव ठाकरे यांनी निर्वाणीचा इशाराही दिला. दिलेल्या मुदतीप्रमाणे १५ दिवसांत खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्या, तसेच बँकांनीही १५ दिवसांच्या आत पात्र शेतकऱ्यांची कर्जे न माफ केल्यास हा मोर्चाच बोलेल, असा सूचक इशारा उद्धव यांनी मोर्चात दिला.
सरकारने विविध योजनांच्या घोषणा केल्या असतानाही त्यांचा लाभ झारीतले शुक्राचार्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत असा शिवसेनेचा आरोप आहे. पीक विमा योजना हे त्या हेराफेरीचे उत्तम उदाहरण असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. विजय मल्ल्या, मोदी, चोक्सी हजारो कोटींचा घोटाळा करून पळून जातात. पण शेतकऱ्यास त्याच्या हक्काचे ‘देणे-घेणे’ पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत. अशा मुजोर विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. त्यांची मुजोरी मोडून त्यांना शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकवण्यासाठी शिवसेनेचा आजचा मोर्चा असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे.