जय श्रीराम आणि वंदे मातरमसाठी मारहाण करणाऱ्यांच्या पाठीशी संघ : मआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप
जय श्रीराम आणि वंदे मातरम म्हटलं नाही तर लोकांना मारहाण केली जाते. केवळ दलित आणि मुस्लिमांनाच लक्ष्य केलं जातंय. या घटनांमागे ज्या संघटना आहेत, त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे, असा गंभीर आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला. काही दिवसांपूर्वी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती.
या घटनेवरून ओवेसी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. मुस्लीम हे दहशतवादी, राष्ट्रविरोधी किंवा गोहत्या करणारे आहेत याच मानसिकतेतून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तसं वातावरण भाजप आणि आरएसएसनं समाजात निर्माण केलं आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
आता त्यांनी वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा न म्हणणाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवरून हल्लाबोल केला आहे. जय श्रीराम आणि वंदे मातरम म्हटलं नाही तर मारहाण केली जाते. या घटना वाढल्या आहेत. मुस्लीम आणि दलितांनाच लक्ष्य केलं जात आहे. यामागे असलेल्या संघटनांचा आरएसएसशी संबंध आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.