World Cup 2019 भारत -पाक सामना : काय काय बोलला विराट पत्रकार परिषदेत ?

पाकिस्तानसोबत होत असलेल्या लढतीचा कोणताही दबाव भारतीय संघावर नाही. अन्य संघांविरुद्धच्या सामन्यांप्रमाणेच आम्ही पाकविरुद्धच्या सामन्याकडे पहात आहोत. या सामन्यामुळे ड्रेसिंग रूममधलं वातावरणही अजिबात बदललेलं नाही, असं नमूद करत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकात रविवारी खेळल्या जात असलेल्या भारत-पाक लढतीवर पत्रकारांशी आज मनमोकळा संवाद साधला.
चाहत्यांसाठी भारत-पाकिस्तान लढत इतर लढतींच्या तुलनेत वेगळी असली तरी आम्हाला मात्र टीम म्हणून खेळत असताना भावनांवर नियंत्रण ठेवावंच लागतं. आम्ही प्रोफेशनल आहोत आणि कोणत्याही संघाविरुद्ध आखलेली व्यूहरचना मैदानात प्रत्यक्ष उतरवण्याचाच आमचा नेहमी प्रयत्न असतो, असे विराट म्हणाला.
पाकविरुद्धची ही लढत कायम सुरू राहणार असे नाही. लढत होणार आणि संपणार. त्यामुळे लढतीचा निर्णय जरी भारताच्या विरोधात गेला तरी तिथेच विश्वचषक संपणार नाही. ही स्पर्धा पुढेही सुरू राहणार आहे. हे ध्यानात ठेवायला हवे, असेही विराट एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाला.
हवामानाचा अंदाज घेऊन तसेच खेळपट्टीची स्थिती लक्षात घेऊन अंतिम ११ खेळाडूंची निवड करण्यात येईल, असे संकेतही विराटने दिले. गोलंदाजांची मानसिक स्थिती उत्तम आहे आणि त्यांच्याबद्दल मला कोणतीच चिंता नसल्याचेही विराट म्हणाला. ‘मी टीआरपीसाठी काहीही बोलणार नाही’, असा टोलाही विराटने लगावला. पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरबाबत विचारले असता, कोणत्याही एका गोलंदाजावर फोकस केला जाऊ शकत नाही, असे विराट म्हणाला.
विजेतेपदाचे दावेदार समजू नका : सचिन
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने प्रत्येकवेळी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी स्वतःला विजयाचा दावेदार समजू नये असं मत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन माजी खेळाडूंनी व्यक्त केलं आहे. ते Star Sports वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होते. तर सौरव गांगुलीने म्हणाला कि , “भारतीय संघाने खूप सावधपणे खेळ करण्याची गरज आहे. आपणच विजयाचे दावेदार आहोत या थाटात संघाने मैदानात उतरु नये. २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला हलकं लेखण्याची चूक केली होती आणि त्याचा फटका संघाला बसला आहे. मात्र हा सामना नक्कीच रंगतदार होईल.”