IndiaNewsUpdate : राहुल गांधी यांनी पुरावे सादर करीत उघड केला निवडणूक आयोगाचा मोठा घोटाळा….
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्येही मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप करीत पत्रकार परिषदेत थेट पुरावेच सादर केले. लोकसभेच्या किमान २५ जागा यामुळे प्रभावित झाल्या असून हा घोटाळा झाला नसता तर आज केंद्रात युपीए सरकार आले असते. पण त्याही पेक्षा गेलेल्या निवंडुकांमध्ये कोण हरले , कोण जिंकले यापेक्षा हा जो मतदार यज्ञातील घोटाळा झाला आहे त्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन यावेळी राहुल गांधी यांनी केले.
पत्रकार परिषदेमधून महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पुराव्यांचं सादरीकरण करताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे.
राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज का देत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार आकडेवारीची मागणी केली आहे. मात्र आम्हाला ती दिली गेली नाही. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यास नकार दिला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, देशामध्ये बनावट मतदान होत आहे. आम्हाला ही चोरी पकडण्यात बराच काळ लागला. या मतदार यादीमध्ये अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिण्यात आलेलं आहे. मतदारस यादीत अनेक घरांचा पत्ता शून्य आहे. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप अधिक आहे. ११ हजार संशयित असे आहेत, ज्यांनी तीन तीन वेळा मतदान केलं आहे. हे लोक कुठून येत आहेत. एकाच पत्त्यावर ४६ मतदार असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी
राहुल म्हणाले, “महाराष्ट्रात ५ महिन्यांत बरेच नवीन मतदार जोडले गेले आहेत, हे ५ वर्षांपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे आम्हाला शंका आली. आमच्या युतीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, पण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजयी झालो. महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आम्हाला संशय आहे. अचानक एक कोटी नवीन मतदार कुठून आले? आम्ही निवडणूक आयोगाकडे मतदार यादी मागितली, पण त्यांनी मतदार यादी दिली नाही.”
निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले
त्यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित केले. राहुल म्हणाले, “एक्झिट पोल, ओपिनियन पोल काहीतरी वेगळेच दाखवतात, जसे हरियाणा आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत दिसून आले आणि नंतर अचानक निकाल काहीतरी वेगळेच निघतो. यामध्ये खूप फरक दिसून आला आहे. आमचा सर्वे देखील खूप मजबूत आहे, परंतु त्याचा निकालही वेगळा दिसतो. सर्वेमध्ये जे काही दिसते, त्याचा निकाल त्याच्या विरुद्धच येतो.”
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला विरोधाला तोंड द्यावे लागते, परंतु त्याचा भाजपवर परिणाम का होत नाही हे मला माहित नाही आणि तो एकमेव असा पक्ष आहे.” ते म्हणाले, “पूर्वी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नव्हती, तरीही संपूर्ण देश एकाच दिवशी मतदान करत असे. आता मतदान महिने चालते. वेगवेगळ्या दिवशी मतदान का केले जाते?”
