Ahmedabad plane crash : LatestNewsUpdate : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले, आतापर्यंत काय माहिती आहे?

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले आहे. एअर इंडियाच्या या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळले. बचाव कार्य चालू आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. हे आता त्यांच्या नावाचा बोर्डिंग पास समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. दरम्यान या विमान दुर्घटनेमुळे परिसरातील इमारतीही कोसळल्या असल्याचे वृत्त असून त्यात किती जीवित हानी झाली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला असून या घटनेची भयावह दृश्य आता समोर येऊ लागली आहेत.
या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.
विमानात १६९ भारतीय आणि ५३ ब्रिटिश नागरिक होते. अहमदाबादमध्ये उड्डाण केल्यानंतर ५ मिनिटांनी एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात १६९ भारतीय होते. याशिवाय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन, १ पोर्तुगीज प्रवासी होते.
हेल्पलाइन नंबर
ब्रिटन सरकारने म्हटले आहे की, “अहमदाबादमधील विमान अपघाताची आम्हाला माहिती आहे. युके भारतातील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे जेणेकरून तथ्ये त्वरित जाणून घेता येतील आणि संबंधितांना मदत करता येईल. ज्या ब्रिटिश नागरिकांना कॉन्सुलर मदतीची आवश्यकता आहे किंवा ज्यांना त्यांच्या मित्र किंवा कुटुंबाची काळजी आहे त्यांनी ०२० ७००८ ५००० वर कॉल करावा.”
अहमदाबाद पोलिसांनी आपत्कालीन क्रमांक जारी केला
अहमदाबाद शहर पोलिसांनी पोलीस आपत्कालीन सेवा आणि अहमदाबाद विमान अपघाताबाबत माहितीसाठी ०७९२५६२०३५९ हा आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे.
‘ती’ बातमी अखेर खरी ठरली….
विजय रूपाणी यांच्या प्रवासाची माहिती आधी फक्त सूत्रांमधून समोर येत होती, पण आता त्यांच्या नावाचा अधिकृत बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बातमीला दुजोरा मिळाला असून, त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे, मात्र याबाबत अजून अधिकृत पुष्टी बाकी आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस व वैद्यकीय पथक दाखल झाले असून, प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
एअर इंडियाकडून आपत्कालीन फोन क्रमांक जारी
अहमदाबाद येथील प्रवासी विमान अपघातानंतर एअर इंडियाने आपत्कालीन फोन क्रमांक जारी केला आहे. 18005691444 असा हा आपत्कालीन क्रमांक आहे.
पंतप्रधान मोदी अन् अमित शाह अहमदाबादकडे रवाना
अहमदाबादमधील मेघानीजवळ कोसळलेल्या एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफच्या 10 मिनीटांत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री पटेल यांनी दिले आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले आहे.
१. पोलिसांनी काय म्हटले?
अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “विमानतळाजवळील मेघनानगर परिसरात एक विमान कोसळले आहे. ते कोणते विमान होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया म्हणाले, “विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या आहेत.”
https://x.com/RubikaLiyaquat/status/1933085461637185711?
२. एअर इंडियाने काय म्हटले आहे ?
एअर इंडियाने त्यांच्या एक्स अकाउंटवर अपघाताची पुष्टी केली आहे, “अहमदाबाद-लंडन गॅटविक येथे जाणारी फ्लाइट क्रमांक एआय१७१ आज १२ जून २०२५ रोजी क्रॅश झाली.”
एअरलाइनने म्हटले आहे की ते अधिक माहिती तपासत आहे आणि पुढील अपडेट्स शक्य तितक्या लवकर शेअर केले जातील.
३. त्यात किती प्रवासी होते आहे ?
नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे प्रमुख (डीजी) फैज किडवाई यांनी बीबीसी हिंदीला माहिती दिली की, “अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणारे बी७८७ ड्रीमलायनर विमान तेथील एका निवासी भागात कोसळले आहे. विमानाने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले आणि उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांतच ते कोसळले. विमानाचे मुख्य पायलट सुमित सभरवाल आणि सह-पायलट क्लाईव्ह कुंदर होते. विमानात २३० प्रौढ प्रवासी, दोन नवजात आणि १० क्रू मेंबर्स होते.”
३. मुख्यमंत्री बघेल यांनी काय म्हटले आहे ?
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी विमान अपघातावर दुःख व्यक्त केले आणि ट्विटरवर लिहिले की, “अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटनेने मी दुःखी आहे. मी अधिकाऱ्यांना अपघातात तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.”
“जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी आणि रुग्णालयात उपचारांसाठी सर्व व्यवस्था प्राधान्याने सुनिश्चित करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.”
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी या अपघाताबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही बोलणे केले आहे.
https://x.com/lokmat/status/1933089652979937791?
पायलटकडून दुर्घटनेपूर्वी आपात्कालीनचा संदेश
विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली.
रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळले विमान
एअर इंडियाचं हे विमान एका इमारतीवर कोसळलं असून ती इमारत रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील 15 डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे अधिकृत निवेदन
“अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं एअर इंडियाचं फ्लाइट 171 आज अपघातग्रस्त झालं, या दुर्घटनेची मी अत्यंत दुःखद मनानं पुष्टी करतो. या विनाशकारी घटनेत बाधित झालेल्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांसोबत आम्ही आहेत. सध्या, आमचे प्राथमिक लक्ष सर्व दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यावर आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना आवश्यक अशी सर्वोतोपरी मदत प्रदान करण्यासाठी आम्ही शक्यतो सर्व प्रयत्न करत आहोत. या दुर्घटनेची अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट्स आम्ही शेअर करू. एक आपात्कालीन केंद्र तात्काळ सुरू करण्यात आलं आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त प्रवाशांबाबत माहिती घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पथकं नेमण्यात आली आहेत.”
काय होता शेवटचा मेसेज?
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यादृष्टीने तपास सुरु आहे. मात्र पायलटने दिलेला शेवटचा मेसेज समोर आला आहे. अपघातापूर्वी वैमानिकाने MAYDAY चा कॉल केला होता. ‘मे डे’ याचा अर्थ मोठा धोका आहे. एअर ट्राफिक कंट्रोलने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या काही सेकंदांच्या शांततेनंतर स्फोटाचा मोठ्ठा आवाज ऐकू आला. विमानाचा वैमानिक सुमित सबरवाल होता, तर सह-वैमानिक कुंदर होता. या दोन्ही वैमानिकांशिवाय 10 सदस्यांचा क्रू विमानात होता.
अमित शाहांचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन
विमानत अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. तसेच, पोलीस आयुक्त, गुजरातच्या गृहमंत्र्यांना देखील अमित शाहांनी फोन केला. केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासन अमित शाह यांनी फोनवरुन दिले आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचे ट्विट
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला, आणि दुःख झाले. आम्ही या घटनेनंतर मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. घटनास्थळावर बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत आणि घटनास्थळी वैद्यकीय मदत आणि इतर मदत पोहोचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. विमानातील सर्व प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी माझी प्रार्थना, असेही नायडू यांनी म्हटले.
प्रियांका गांधी यांनी विमान अपघाताबद्दल व्यक्त केला
शोक
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, “एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांच्या आणि क्रू मेंबर्सच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना. संपूर्ण देशाला आशा आहे की तुमचे प्रियजन या भयानक अपघातातून वाचतील. देव तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.”