व्वा रे पट्ठ्या … स्वतःच न्यायालय सुरु केले , न्यायाधीश बनला , निकालही दिला पण अखेर गजाआड गेला….

मुंबई : काही दिवसांपूर्वी झारखंड मध्ये काही नटवरलाल मंडळींनी मिळून फेक एसबीआयची हुबेहूब शाखा तयार केली होती आता गुजरातच्या अहमदाबादमधील एका वकिलाने तर त्याच्याही पुढे जाऊन स्वतः च्या घरातच कोर्ट सुरू केले इतकेच नव्हे तर स्वतः न्यायाधीश बनला आणि निकाल देऊन मोकळा झाला तरी कोणाच्या कानाला खबर नव्हती परंतु अखेर हा बनाव उघड होताच या वकिलाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
विशेष म्हणजे या घटनेने चक्क न्यायव्यवस्थेलाच हादरा दिला आहे. मॉरिस सैमुअल क्रिश्चियन असे या वकिलाचे नाव असून त्याने चक्क न्यायाधीश असल्याचे सांगत, न्यायालयात खटला चालवून सरकारी जमिनींसंदर्भात या पट्ठ्याने न्यायालयीन आदेश जारी केला होता. याप्रकरणी आरोपी मॉरिसच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गुजरातमध्ये गेल्यावर्षी अनेक बनावट व फसवणुकीच्या घटनांमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी रजिस्ट्रार हार्दिक देसाई यांनी आरोपी मॉरिस सैमुअल क्रिश्चियन या वकिलाविरुद्ध अहमदाबादच्या कारंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मॉरिसला अटक केल्यानंतर पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केली असून मॉरिसने 2019 साली वादग्रस्त सरकारी जमिनींसंदर्भात न्यायालयीन खटला चालवून बनावट आदेश जारी केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं आहे. आरोपी मॉरिस सैमुअल क्रिश्चियन याने राखी वासणा परिसरात खोटं न्यायालय उभारलं होतं. या न्यायालयात त्याने वकिल, क्लर्क आणि इतर कर्मचाऱ्यांचीही भूमिका निभावली आहे. तर, या न्यायालयात न्यायाधीश म्हणून जमिनीच्या वादासंदर्भातील खटल्यात निकालही दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी, अहमदाबाद पोलिसांनी कलम 170, 419, 420, 465, 467 आणि 471 अन्वये खटला दाखल केला आहे. दरम्यान, यापूर्वीच आरोपी मॉरिसविरुद्ध मणिनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल आहे. ज्यामध्ये, कलम 406, 420, 467, 468 आणि 471 अन्वये कारवाई सुरू आहे. आता, न्यायालय प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वीच गुजरातमधील फेस पीएमओ अधिकारी, फेक आयपीएस आणि फेक आयएएस अधिकारी पकडण्यात आले होते. आता, फेक न्यायाधीशालाही पोलिसांनी अटक केल्याने प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी होत आहे.