BJPNewsUpdate : हरियाणा नंतर झारखंड , दिल्ली आणि महाराष्ट्र जिंकणार भाजप , जे. पी . नड्डा यांचा विश्वास….

नवी दिल्ली : हरियाणाचा निकाल लागला, हरियाणात कमळ फुलले आता महाराष्ट्रात कमळ फुलवायचे आहे. नंतर झारखंड आणि मग दिल्लीत सुद्धा मोदींच्या नेृत्त्वात कमळ फुलवायचे आहे असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आणि जम्मू-काश्मीरमध्ये वाढलेला मताधिक्याबद्दल नड्डा यांनी हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नड्डा यांनी नागरिकांचे आभार मानले आणि विजयामागील कारण पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आहे असे अधोरेखित केले. जनतेच्या सततच्या पाठिंब्यामुळे भाजपला हरियाणात वारंवार यश मिळत असल्याचे नड्डा म्हणाले.
हरियाणातील विजयाचा दाखला देत नड्डा म्हणाले, आम्ही हरियाणामध्ये मिळवलेला विजय आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये आमच्या मतांची झालेली वाढ ही सर्व पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शक्य झाली आहे. यावरून लोकांनी भाजपवर टाकलेला विश्वास दिसून येतो. नड्डा यांनी काँग्रेसवरही टीका केली. नड्डा म्हणाले, “काँग्रेस शक्य तितक्या मार्गाने खोटे पसरवण्यात व्यस्त होते, परंतु जनतेने त्यांचे ऐकले नाही आणि हरियाणात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची निवड केली. आज भाजप तरुण, शेतकरी, महिला, दलितांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पक्ष आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हे सरकार दमदार काम करेल. काँग्रेसने पसरवलेला खोटारडेपणा फटकारत हरियाणातील जनतेने भाजपची निवड केली आणि काँग्रेसला धडा शिकवला आहे.”
काँग्रेस जातीवर आधारित विभाजन आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देते….
काँग्रेस जातीवर आधारित विभाजन आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देते. परंतु मोदींनी राजकीय परंपरा बदल्याचे नड्डा यांनी ठामपणे सांगितलं. जिथे काँग्रेस अस्तित्वात आहे तिथे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीही वाढत असल्याचा दावा नड्डांनी केला. पंतप्रधान मोदींनी देशातील राजकारणाची परंपरा बदलून टाकली आहे. नड्डा पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हरियाणा हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे आणि आमचे सरकार कोणत्याही अडथळ्याविना सलग तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार स्थापन होत आहे. मोदींच्या नेतृत्वात हरियाणातील आमच्या जागा आणि मतांचा वाटा दोन्ही वाढले आहे. ”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
एकनाथ शिंदे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत जातीवाद हरला आणि विकास जिंकला. डबल इंजिन सरकारची विजयी घौडदौड कायम आहे. हरियाणातील जनतेने सलग तिसऱ्यांदा डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला आहे. या विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करतो. तिघांच्याही अथक प्रयत्नांमुळे आज विरोधकांच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे, असे ते म्हणाले.
जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्रात घडेल – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. या हॅट्रिक विजयासाठी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. लोकसभा निवडणुकीत आपल्याला फेक नॅरेटिव्हमुळे कमी मते मिळाली. तेव्हापासून फेक नॅरेटिव्हला, थेट नॅरेटिव्हने उत्तर द्यायचे ठरवले. परिणामी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला आहे. जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. हरियाणात यावेळी विजयाचे सर्व रेकॉर्ड तोडत आपण थेट ४८ जागा जिंकलेल्या आहेत. तसेच, गेल्या ६० वर्षात प्रथमच सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारा भाजपा हा एकमेव पक्ष ठरला आहे. हा विजय भाजपा कार्यकर्त्यांचा आत्माविश्वास वाढवणारा आणि मुर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा आहे, असे ते म्हणाले.