अखेर केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय होणार फायदा?

मुंबई : अखेर केंद्र सरकारने माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे . अभिजात दर्जा मिळवणारी मराठी भाषा 7 वी भाषा आहे . हा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या 10 वर्षांपासूनचा लढा देण्यात येत होता. 2013 सालापासून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी, त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती. आता, केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 13 कोटी मराठीजनांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे मराठी भाषेचा विकास, ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा गौरवली जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असून ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचे कौतुक करताना , ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके….’ असे वर्णन केलेले आहे. त्यामुळे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावी, अशी मागणी कोट्यवधि मराठी बांधवांकडून व राजकीय नेत्यांकडून करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
4) भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं शक्य होणार
5) मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत
अभिजात दर्जा मिळवणारी मराठी भाषा 7 वी
सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील 7 वी भाषा ठरली आहे. सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. आता, विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
नितीन गडकरी काय काय म्हणाले?
नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा : फडणवीस
आपल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की , आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.