पोर्ट पोर्ट ब्लेयरचे नाव केंद्र सरकारने बदलले , अमित शाह यांनी केली घोषणा ….

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयरचे नामांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या नामांतरणासंदर्भात घोषणा केली आहे. आता, राजधानी पोर्ट ब्लेयरचे नाव श्री विजयपुरम करण्यात येत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. पोर्ट ब्लेयर एक गुलामगिरीचे प्रतिक होते. त्यामुळे, केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयरचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. गुलामगिरीच्या खूणा संपविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संकल्पातून प्रेरीत होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेयरचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित शाह यांनी ट्विटरवरुन अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्याा पोर्ट ब्लेयरचे नाव आता श्री विजयपुरम होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, श्री वजियपुरम हे नाव आपल्या स्वाधीनताच्या संघर्षाला आणि त्यामध्ये अंदमान-निकोबारच्या योगदानाला दर्शवते. देशाच्या स्वाधीनता आणि इतिहासात या अंदमान-निकोबार बेटाचे अतुलनीय स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदलाचे केंद्र राहिलेली ही भूमी आहे. आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्याचं काम या भूमीतून, या बेटावरुन होत आहे, असेही अमित शाह यांनी म्हटलंय. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून सर्वात पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेलं हे बेट आहे. तसेच, सेलुलर जेलमध्ये वीर सावरकर व अन्य स्वातंत्र्य सैनिकांद्वारे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाची ही भूमी आहे, असेही अमित शाह यांनी म्हटले.
दरम्यान, केंद्र सरकारने या आधी रोस आयलँडचे नामकरण केले होते, नेताजी सुभाषचंद्र बोस असे या आयलँडचे नाव करण्यात आले आहे. त्यासह, नील आयलँडचे नामांतर शहीद द्वीप आणि हेवलॉक आयलँडचे नामांतर स्वराज्य द्वीप म्हणजे बेट असे करण्यात आले आहे.