Loksabha2024 Update : जिल्हाधिकाऱ्यांना अमित शाह यांच्या धमक्या ? आयोगाने मागितली माहिती …

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री अमित शाह हे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. काँग्रेसच्या या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्याबद्दलचा खुलासा मागितला आहे.
निवडणूक आयोगाकडे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तक्रार केली होती की, गृहमंत्री अमित शाह यांनी मतमोजणीच्या आधी १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन धमकावले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टद्वारे केलेल्या सार्वजनिक वक्तव्याबाबत वस्तुस्थिती आणि तपशील मागितला आहे. जयराम रमेश यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्यांना याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने जय राम रमेश यांच्याकडून रविवारी सायंकाळपर्यंत उत्तर मागितले आहे.
जयराम रमेश यांनी काय म्हटले आहे ?
“गृहमंत्री आज सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलत आहेत. आतापर्यंत १५० अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावण्याचा हा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लक्षात ठेवा लोकशाही धमक्यांवर नव्हे तर आदेशावर चालते. ४ जूनच्या जनादेशानुसार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडतील आणि भारताचा विजय होईल. अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता संविधानाचे रक्षण करावे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले होते.
दरम्यान, आता निवडणूक आयोगाने काँग्रेसचे जयराम रमेश यांना मतमोजणीपूर्वी गृहमंत्र्यांनी १५० जिल्हा दंडाधिकाऱ्यांना फोन केल्याच्या त्यांच्या दाव्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे २ जूनच्या सायंकाळपर्यंत उत्तर मागितले आहे.