सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या हाती एका हाती सत्ता , भाजपचा मात्र धुव्वा …. !!

नवी दिल्ली : सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत ३२ पैकी ३१ जागा जिंकून सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने (SKM) इतिहास घडवला आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या भाजपाचा सिक्कीममध्ये मात्र पुरता धुव्वा उडाला आहे. या विजयानंतर सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि SKM पक्षाचे नेते प्रेमसिंग तमांग पुन्हा येथे आपले सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे सिक्कीम भाजपाचे अध्यक्ष दिल्ली राम थापा यांनाही पराभव पत्करावा लागला.
दरम्यान या अभूतपूर्व यशानंतर गंगाटोक येथे पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे. यावेळी सिक्कीमचे मुख्यमंत्री तमांग म्हणाले की , “आम्ही जिंकणार असल्याचे निश्चित झाले असून या विजयाबद्दल मी सिक्कीमच्या संपूर्ण जनतेचे आभार मानतो. २०१९ ला सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक अडचणी आल्या. करोनोचा काळ, चक्रीवादळ, पूरस्थिती अशा परिस्थितीही सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सिक्कीमच्या लोकांसाठी काम केले होते. त्यामुळे या विजयाचे श्रेय मी सिक्कीमच्या जनतेला देतो. पूर्व मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना आम्ही हरवले आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने मनापासून प्रत्येक मतदारसंघात काम केले होते. त्या कामाची पावती म्हणून आम्ही जिंकलो आहे. चामलिंग २०१९ लाच हरले होते. परंतु, ही लोकशाही आहे. त्यामुळे त्यांनी २०२४ लाही त्यांनी निवडून लढवली. गेल्या २५ वर्षांत त्यांनी जे केले नाही ते आम्ही ५ वर्षांत केले म्हणूनच आमचा विजय झाला.”
गेल्या निवडणुकीत एसकेएम पक्षाने १७ जागा तर, एसडीएफने १५ जागांवर विजय मिळवला होता. यंदा तर, एसकेएमने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत एसडीएफला धूळ चारली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येथे ८२.९५ टक्के मतदान झाले. तर, आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
विरोधी एसडीएफला केवळ एक जागा…
विशेष म्हणजे एसडीएफला केवळ शायरी मतदारसंघातून विजय मिळवता आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि एसडीएफचे अध्यक्ष पवन कुमार चामलिंग हे SKM उमेदवार भोज राज राय यांच्याकडून ३ हजार ६३ मतांच्या फरकाने हरले. ते तब्बल पाच वेळा सिक्कीमचे मुख्यमंत्री होते . आठ वेळा आमदार राहिलेले चामलिंग हे त्यांच्या मूळ नामची जिल्ह्यातील पोकलोक कामरंग जागेवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या भोज राज राय यांच्याकडून तीन हजार ६३ मतांनी पराभूत झाले.