VidhanSabhaNewsUpdate: अंतरवाली सराटीतील पोलिसांच्या लाठीहल्ला प्रकरणी आधी माफी पण विधान सभेत फडणवीस यांच्याकडून पुनश्च समर्थन …

मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबाबत आपले लेखी उत्तर सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या दिवशी झालेल्या घटनेशी संबंधित संपूर्ण तपशील सादर करत कोणत्याही स्थितीमध्ये सरसकट गुन्हे मागे घेण्यास ठाम नकार दिला.या लेखी उत्तरातून मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना जोरदार धक्का दिला आहे.
राज्यात गाजलेल्या अंतरवाली सराटीतील लाठीचार्जच्या घटनेचा संपूर्ण तपशील आज विधानसभेत देवेंद्र फडवणीस यांनी सादर केला. हा तपशील सादर करत असताना त्यांनी लाठीचार्ज प्रकरणी काही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक व वाजवी पद्धतीने त्यांच्या बळाचा वापर केला. तसेच या घटनेत जवळपास ५० आंदोलन व ७९ पोलीसकर्मी जखमी झाले आहेत. या कारणास्तव सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतरच या प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे फडवणीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मागितली होती आंदोलकांची माफी…
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये २९ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. यादरम्यान पोलिसांनी त्यांच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. विरोधकांनी लाठीचार्जबाबत गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जबाबदार ठरवले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आंदोलकांची माफी मागितली होती. या लाठीचार्जच्या झालेल्या प्रकरणानंतर जरांगे पाटलांची राज्यभरातील ताकद फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन राज्यभरात पेटलेले असताना अंतरवाली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी जोर धरून लावली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्यास नकार दिल्याने मराठा आंदोलन आता मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र होणार असल्याची शक्यता होत आहे.