Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : लाठीहल्ला प्रकरणी आंदोलकांची माफी मागून , फडणवीस यांची विरोधकांवर टीका

Spread the love

मुंबई : जालना लाठीहल्ला प्रकरणावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू स्पष्ट केली. यावेळी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याबाबत आंदोलकांची माफी मागितली. अशा प्रकारच्या बळाचं वापर करण्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. यापूर्वीही पाच वर्षे मी गृहमंत्री होतो आणि जवळपास २ हजार आंदोलनं ही आरक्षणाच्या संदर्भातली झाली होती. परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग आम्ही केला नाही. आत्ताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. सर्वात आधी ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे, जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रति मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा निर्णयही घेण्यात आला असल्याचेही फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्याचे विविध महाधिवक्ता, छत्रपती उदयनराजे भोसले, काही काळाकरता संभाजीराजेही उपस्थित होते. विविध अधिकारी होते. मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेली परिस्थिती आहे त्यावर चर्चा झाली. जालन्यातल्या आंदोलनावरही सखोल चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

… तर मग गोवारी , मावळबाबत आदेश कोणी दिले होते ?

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की , या घटनेचं राजकारण होणं हे योग्य नाही. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तो पण प्रयत्न केला. ही बाब दुर्दैवी आहे. विशेषतः लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, वरुन आले अशा प्रकारचं मत तयार करण्याचे प्रयत्न झाले. सगळ्या नेत्यांना हे माहित आहे की लाठीचार्जचे निर्णय देण्याचे अधिकार एस.पी. आणि डी. वाय. एसपी यांच्या पातळीवर असतात. त्यासाठी कुणालाही विचारावं लागत नाही.

मग माझा सवाल हा आहे की निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा त्याचा आदेश कुणी दिला होता का? तो आदेश मंत्रालयातून आला होता का? मावळला गोळीबारात शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याचं प्रकरण झालं होतं तेव्हा ते आदेश तेव्हा मुख्यमंत्री असलेल्यांनी दिले होते का? जालन्यातली घटना चुकीचीच आहे पण सरकार हे करतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे त्यातून लोकांनाही कळतं आहे की हे राजकारण चाललं आहे.

मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की , आरक्षणाचा कायदा २०१८ मध्ये आपण तयार केला. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने तो कायदा मान्य केला. देशात आरक्षणाचे दोनच कायदे मान्य झाले आहेत एक तामिळनाडू आणि दुसरा महाराष्ट्र यांचा. पुढे सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे सरकार बदलल्यानंतर २०२० मध्ये या कायद्यावर स्थगिती आली आणि २०२१ मध्ये तो कायदा रद्द झाला.

उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की , उद्धव ठाकरे हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा. ५ मे २०२१ पासून एक वर्ष, एक महिना तुम्ही मुख्यमंत्री होतात तर मग यावर तुम्ही वटहुकूम का काढला नाहीत? निव्वळ राजकारण करायचं हा सगळा उद्योग आहे. उद्धव ठाकरे जात होते तेव्हा राजेश टोपेंना काय सर्कस करावी लागली ते माहित आहे सगळ्यांना त्यावर मी बोलणार नाही. आमच्या काळात आम्ही ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या होत्या असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!