ParliamentNewsUpdate : मोठी बातमी : संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन , भाजप ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक आणण्याच्या तयारीत …
नवी दिल्ली : केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून त्यामध्ये पाच बैठका होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल मीडिया साइट X वर ही माहिती दिली. यानंतर मोदी सरकार विशेष अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक आणू शकते, अशी अटकळ सुरू झाली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पाच दिवस चालणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.
भाजपला अनेक दिवसांपासून ‘एक देश-एक निवडणूक’ हवी आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केला आहे. एक देश, एक निवडणूक ही भारताची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आगामी विशेष अधिवेशनात मोदी सरकार संसदेत वन नेशन-वन इलेक्शनवर विधेयक आणू शकते. असे झाल्यास संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पाहायला मिळू शकते.
विधी आयोगही वन नेशन, वन इलेक्शन या विषयावर खूप सक्रिय आहे. या वर्षाच्या सुरुवातीला विविध राजकीय पक्षांकडून उत्तरेही मागवली होती. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी सरकारने हे विधेयक आणल्यास ते निश्चितच मोठे पाऊल मानले जाईल. यावर काँग्रेससह विरोधी पक्षही विरोध करू शकतात. एक देश-एक निवडणूक या अंतर्गत लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील.
पंतप्रधान मोदी ‘एक देश-एक निवडणूक’च्या बाजूने का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा एक देश, एक निवडणुकीचा उल्लेख केला आहे. एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने त्यांचा आग्रह आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती. मात्र, त्यानंतरही राजकीय पक्षांची मते वेगळी होती. पंतप्रधान मोदींचा एक देश-एक निवडणुकीमागील तर्क असा आहे की यामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर देशाच्या पैशाचीही बचत होईल. देशात दरवर्षी अनेक विधानसभा निवडणुका होत असल्याची माहिती आहे. याशिवाय दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जातात. अशा स्थितीत या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास पैसा आणि वेळ वाचेल, असा युक्तिवाद भाजपने केला आहे.
18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान ‘अमृत काल’ दरम्यान ‘संसदेचे विशेष अधिवेशन’ बोलावले आहे, ज्यामध्ये पाच बैठका होणार आहेत. “संसदेचे विशेष अधिवेशन (17व्या लोकसभेचे 13वे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन) 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत बोलावण्यात आले आहे,” असे संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी ‘X’ या सोशल मीडिया साइटवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. तथापि, हे अधिवेशन 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत G20 शिखर परिषदेनंतर काही दिवसांनी होणार आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. संसदीय कामकाज मंत्री म्हणाले की , “अमृतकाळात होणारे हे अधिवेशन संसदेत फलदायी परिणाम देणारे असून या निमित्ताने होणारी चर्चा आणि वादविवादासाठी मी उत्सुक आहे. ”