Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPCrisesNewsUpdate : शरद पवार हे माझं दैवत आहेत… म्हणत म्हणत अजित पवारांची दैवतावर आक्रमक टीका … !!

Spread the love

मुंबई : शरद पवार हे माझं दैवत आहेत असे म्हणत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला. एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर ५८ व्या वर्षी रिटायर्ड होतो. IAS, IPS असेल तर ६० व्या वर्षी रिटायर्ड होतात. राजकारणात असेल तर भाजपात ७५ व्या वर्षी रिटायर्ड केलं जातं. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी ही उदाहरणं आहेत असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीवरून बोचरी टीका करताना : मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? असे प्रश्न उपस्थित केले.

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट चर्चेचा विषय ठरली आहे. आज त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळाले. एका दिवशी एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार गट या दोघांची एकाच वेळी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी त्यांची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांनी थेट शरद पवारांना लक्ष्य करताना त्यांच्या विविध भूमिकांवर तीव्र आक्षेप नोंदवला. यावेळी अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी शरद पवारांवर निवृत्तीसंदर्भातही टीका केली.

तुम्ही कधी थांबणार आहात का?

अजित पवार पुढे म्हणाले की , आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंत राव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं.

त्यांनी राजीनामा मागे का घेतला ?

मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? मला महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक आहे की नाही? जे प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव शेवटी का होईना येतं ना? मग मला का आशीर्वाद का दिला जात नाही. शेतकरीही ६० वर्षांचा झाला की २५ वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं आता शेती तू बघायची आणि आम्ही तुला सल्ला देऊ.

मी सुप्रियाला विचारलं हा नेमका कुठला हट्ट?

मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत त्यांना काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? शरद पवारांविषयी आम्हाला खूप आदर आहे. आत्ता सांगितलं की काही काही आमदारांना बोलवलं जातं. ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नींना फोन केला जातो भावनिक केलं जातं. मी नाव घेत नाही वरिष्ठ नेत्याने एका आमदाराला सांगितलं की का तिकडे जातो. त्याने हात जोडून सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला आहे.

आज देशात नरेंद्र मोदींचा करीश्मा…

अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे काहीतरी करा, २०१९ चं आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही आता काही पावलं उचलली तर आम्ही तुम्हाला साथ देऊ. आज नरेंद्र मोदींचा करीश्मा देशात आहे. २०१४ च्या निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींकडे पाहून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भाजपा सत्तेवर आला आहे. २०१९ ला पुन्हा त्यांना निर्विवाद बहुमत मिळालं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीवर आणि आपल्यावर ही वेळ का आली? मी देखील साहेबांच्याच छत्रछायेखाली मी तयार झालो आहे. १९७८ ला आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार स्थापन करुन पुलोदचं सरकार आणलं. त्यावेळी शरद पवार हे ३८ वर्षांचे होते. तेव्हापासून साहेबांचं राजकारण महाराष्ट्र बघत होते. पुलोदच्या सरकारमध्ये जनसंघही होता, जो आत्ताचा भाजपा आहे.

अजित पवार यांनी सांगितलं पवारांचा इतिहास …

मी फार मागे जाणार नाही. आपल्या नेत्यांनी सुरुवात १९६२ मध्ये केली. त्यानंतरचा काळ काही लोक जन्मालाही आले नव्हते. मात्र काळ सरकत होता. १९६७ ला बारामतीकरांनी निवडून दिलं. १९७२ ला राज्यमंत्री झाले. १९७५ ला मंत्री झाले. १९७८ ला एक प्रसंग आला आणि वसंतदादा पाटील सरकार स्थापन केला. ३८ व्या वर्षी साहेब (शरद पवार) मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून हा महाराष्ट्र त्यांना साथ देतो आहे. आम्ही राजकीय जीवनात आलो आपण सगळ्यांनी साथ दिली.

१९७८ चा काळ गेला आणि १९८० चा काळ आला. ८० च्या दशकात पुन्हा इंदिरा गांधी यांची लाट आली होती. पुलोदमध्ये जनसंघही सामील होता, जो आत्ता भाजपा आहे. उत्तमराव पाटील, हशू पटेल हे त्या मंत्रिमंडळात होते. १९८० ला ते सरकार गेलं. त्यावेळी इंदिराजींनी सांगितलं होतं सगळे काँग्रेसमध्ये आलात तर सरकार ठेवते. मात्र ते झालं नाही, त्यामुळे १९८० ला सरकार गेलं आणि निवडणूक झाली. इंदिराजी निवडून आल्या. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. इतिहास जर पाहिला तर तुमच्या माझ्या देशाला करीश्मा असणारं नेतृत्व लागतं.

जनता पक्ष आत्ता कुठे आहे?

जयप्रकाश नारायण यांचं ऐकून जनता पक्षाला निवडून दिलं होतं. १९७७ ला देशपातळीवर असणारा जनता पक्ष आत्ता कुठे आहे? तो पक्ष शोधावा लागतोय का? कारण करीश्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता. त्यानंतरच्या काळात १९८५ ला पुन्हा समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस असे पक्ष साहेबांनी काढले. त्यावेळीही त्यांना साथ दिली गेली. १९८५ ला आपण विरोधी पक्षांत गेलो. प्रत्येकाचा काळ असतो हे लक्षात घ्या. आपण साधारण वयाच्या २५ ते ७५ या काळात आपण उत्तम काम करु शकतो. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असते.

हे सगळं घडत असताना काय झालं मला माहित नाही. पण जनतेला आणि कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं १९८६ ला समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. त्यानंतर दोन वर्षे नेत्यांना पद मिळालं नाही. १९८८ ला राजीव गांधी पंतप्रधान असताना मुख्यमंत्रीपद दिलं. १९९० ला पुन्हा निवडणुका झाल्या बहुमत आलं नाही. १९९१ ला राजकारण बदललं . मला लोकसभेवर जाता आलं, प्रफुल्ल पटेलांना लोकसभेवर जाता आलं. त्यावेळी एका घटनेत राजीवजी निघून गेले. मग एक लाट आली आणि नरसिंहराव पंतप्रधान झाले. मग साहेब संरक्षण मंत्री म्हणून गेले. सुधाकरराव नाईक यांना जबाबदारी दिली. मग १९९३ ला बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरसिंह राव यांनी पुन्हा साहेबांना महाराष्ट्रात पाठवलं. १९९५ ला शिवसेना भाजपा युती आली. मनोहर जोशी , नारायण राणे मुख्यमंत्री होते तो काळही आपण पाहिला असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

मी जातीपातीचं राजकारण केलं नाही….

१९९९ ला आपल्याला सांगण्यात आलं सोनिया गांधी परदेशी आहेत. परदेशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही. १९९९ ला भुजबळांनी पुढाकार घेतला आणि तुम्ही साथ दिली. चार महिन्यांनी निवडणुका लागल्या त्यावेळी मैदान गाजवण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं. हा इतिहास तुम्हाला आठवत असेल. त्यानंतरच्या काळात मी, आर. आर. पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील सगळे तरुण होतो. आमचीही काही स्वप्नं होती. आम्हाला महाराष्ट्र आपल्या परिने घडवायचा होता. विलासरावांच्या मंत्रिमंडळातही आपण जिवाचं रान करुन काम केलं. त्यावेळी मला कृष्णा खोऱ्याचं खात दिलं गेलं ती जबाबदारी आम्ही घेली. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी जातीपातीचं राजकारण केलं नाही. कुणीही कार्यकर्ता आला की त्याचं काम करुन देण्याची भूमिका घेतली. हे सगळं राज्य पुढे जाण्यासाठीच करतो आहे.

मुख्यमंत्रीपदाची आलेली संधी सोडली …

देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. २००४ ला आपले ७१ आमदार आले आणि काँग्रेसचे ६९ आमदार आले. त्यावेळी मला पक्षात फार महत्त्वाचं स्थान नव्हतं. त्यावेळी सोनिया गांधी यांनी विलासरावांना हे सांगितलं होतं की राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. आम्हाला विलासरावांनी विचारलं की तुमच्यात मुख्यमंत्री कोण होईल? त्यावेळी छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांची नावं चर्चेत होती. पण आलेली संधी सोडून तेव्हा आपण चार खाती जास्त घेतली आणि आपण मुख्यमंत्री पद घेतलं नाही. ती संधी मिळाली असती तर ठामपणे सांगतो आजपर्यंत तुम्हाला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आपला पक्ष वाढला पाहिजे…

आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करतो आहोत. आम्हालाही कळतं निवडून आल्यावर जनतेची हीच अपेक्षा असते की आमच्या आमदारांनी विकास करावा, तशाच पद्धतीने आम्ही काम करत आलो आहोत. सगळ्यांच्या साथीने उद्याला आपल्याला पुढे जायचं आहे. पण पुढे ७१ वरुन आपण खाली आलो. त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. तेव्हा काँग्रेसच्या जागा जास्त आल्या होत्या. त्यानंतर सरकार आलं. २००४ ला खासदारही कमी होते, नंतरही ते चार, आठ, सात यापेक्षा पुढे आपण गेलो नाही हे वास्तव आहे. मला मनापासून वाटत होतं आपला पक्ष वाढला पाहिजे. खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवे कार्यकर्ते, नव्या महिला कार्यकर्त्या पुढे आल्या पाहिजेत. २५ वर्षांनी नवी पिढी पुढे येते, ५० वर्षांनी दुसरी पिढी येते, ७५ वर्षांनी तिसरी पिढी येते. हे चक्र आहे.

२०१४ मध्ये एकदा भाजपाची सत्ता नसताना भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं १६ जागा राष्ट्रवादी, १६ शिवसेना आणि १६ भाजपा असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र भाजपाने काही गोष्टी मागे घेतल्या. २०१४ ला भाजपाची सत्ता आली. भाजपाची सत्ता आल्यानंतर राज्यात भाजपाची सत्ता आली. जो समन्वय असला पाहिजे तो झाला नाही. विरोधी पक्षात बसावं लागलं. पण आपण खूप पुढे गेलो नाही. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे बहुमत प्रचंड आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

२०१४ला बाहेरून पाठिंबा दिला

यावेळी अजित पवारांनी २०१४मध्ये घडलेल्या घडामोडींचा उल्लेख केला. “२०१४मध्ये प्रफुल्लभाईंचं शरद पवारांशी बोलणं झालं. नंतर प्रफुल्लभाईनी जाहीर केलं की आम्ही बाहेरून भाजपाला पाठिंबा देतो. आम्ही गप्प बसलो. का? तर नेत्यांनी निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा. नरेंद्र मोदी मला ओळखतात. ते आमच्याशी बोलले. तेव्हा त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला तिथे का पाठवलं? मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवलं?” असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयावर उपस्थित केला.

२०१७ ला काय घडलं होतं?

अजित पवारांनी २०१७ला घडलेल्या घडामोडी, बैठकांविषयीही गौप्यस्फोट केला. “२०१७ ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मी, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि अजून एक असे चार जण होतो. समोर सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे चौघं होते. कुठली खाती, कुठले पालकमंत्रीपदं हे सगळं ठरलं होतं. मी खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवाराची औलाद सांगणार नाही. आम्हाला निरोप आला. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं २५ वर्षांचा आमचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. ते म्हणाले शिवसेनाही आघाडीत राहील. आपल्या वरिष्ठांना ते मान्य नव्हतं. ते म्हणाले ‘शिवसेना आम्हाला चालणार नाही. शिवसेना जातीवादी आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यावेळच्या घटना सांगितल्या.

२०१९चा ‘तो’ शपथविधी आणि राजकीय घडामोडी

दरम्यान, यावेळी २०१९ साली घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीआधी घडलेल्या घडामोडींवरही अजित पवारांनी यावेळी भाष्य केलं. “२०१९ला निकाल लागले, मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, प्रफुल्ल पटेल, ते उद्योगपती, भाजपाचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला आपल्या नेत्यांनी सांगितलं की कुठे बोलायचं नाही. मग मी का बोलेन कुठे? नंतर अचानक बदल झाला आणि सांगितलं की आपण शिवसेनेबरोबर जायचंय. मला सांगा, २०१७ला शिवसेना जातीवादी असल्याचं सांगत त्यांच्याबरोबर जायचं नाही असं म्हटलं. मग असा काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्रपक्ष झाला? ज्या भाजपाबरोबर जायच होतं तो जातीवादी कसा झाला?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!